काँग्रेसने महाराष्ट्र मोठा केला राज्याच्या विकासात कामगारांचे भरीव योगदान – पृथ्वीराज पाटील
प्रतिष्ठा न्यूज
सांगली दि.१ : कामगारांचा सन्मान व त्यांना कामासाठी चांगली परिस्थिती निर्माण करणे हा मुख्य उद्देश कामगार दिन साजरा करण्यामागे आहे.आपल्या न्याय हक्कासाठी अमेरिकेत शिकागो येथे आंदोलनावेळी अनेक कामगारांनी हौतात्म्य पत्करले. भाषावार प्रांतरचना होताना पाच वर्षे महाराष्ट्रातील शेतकरी व कामगारांनी स्वातंत्र्यानंतरचा पहिला मोठा लढा उभा करून मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र निर्माण केला. या कामी १०७ व्यक्तींनी हौतात्म्य पत्करले. हौतात्म्य पत्करलेल्या सर्वाना अभिवादन करणे हे आपले कर्तव्य आहे. कामगारांचा सन्मान व मराठी भाषा, मराठी माणूस व महाराष्ट्र यांच्या भल्यासाठी काँग्रेस पक्षाचे योगदान मोठे आहे. पंडीत नेहरु, यशवंतराव चव्हाण,प्रा. के. अत्रे, श्रीपाद डांगे, एस. एम. जोशी, ना. ग. गोरे, क्रांतिसिंह नाना पाटील, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे, अमर शेख व अनेक मान्यवरांनी महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी मोठे योगदान दिले आहे. त्यांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. असे प्रतिपादन सांगली शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी केले. आज काँग्रेस भवन व स्टेशन चौकात म. गांधी पुतळ्यासमोर जागतिक कामगार दिन व महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजवंदन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
यावेळी त्यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. राष्ट्रगीत व वंदेमातरम गायन झाले. पृथ्वीराजबाबा पुढे म्हणाले, ‘कामगारांच्या घामातून राष्ट्राची जडणघडण होते. शेतकरी व कष्टकरी कामगारामुळे प्रगती साध्य झाली. महाराष्ट्रात दररोज कष्टकरी कामगार व शेतकऱ्यांचा सन्मान झाला पाहिजे. त्यांच्या हिताचे निर्णय झाले पाहिजेत.’
अजित ढोले यांनी सूत्रसंचालन केले. आभार अरुण पळसुले यांनी मानले. यावेळी सी. आर. सांगलीकर, श्रीधर बारटक्के, अनिल मोहिते, प्रा. एन.डी.बिरनाळे, प्रमोद आवळे, मीना शिंदे, सीमा कुलकर्णी, भाऊसाहेब पवार वकील, रामसिंग परदेशी, विठ्ठलराव काळे, सिद्रया गणाचार्य, महेश खराडे वकील, सुरेश गायकवाड, शैलेंद्र पिराळे, जिल्हा परिषद माजी समाज कल्याण सभापती सदाशिव खाडे, किरण पाटील, सचिन इनामदार व काँग्रेसचे सेवा दल, फ्रंटल संघटना, विविध सेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.