शेअर मार्केटींग इनवेस्टमेंटच्या नावाने बोगस कंपन्यांकडून ज्यांची फसवणूक झाली त्यांनी तक्रार देण्यास पुढे यावे : नारायण देशमुख (पोलीस निरीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा, सांगली)
प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : येथील डेक्कन मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन हॉल, माधव नगर रोड सांगली येथे श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या वतीने जनजागृती मेळावा संपन्न झाला.
या मेळाव्यामध्ये आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख साहेब, प्रसिद्ध उद्योजक सतिश शेठ मालू, चार्टर्ड अकांउटंट अक्षय जोशी, प्रसिद्ध उद्योजक मनोहरजी (काकाजी) सारडा, सायबर सेल ची टिम उपस्थित होते.
या मेळाव्यात बोलताना श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान चे संस्थापक अध्यक्ष नितीन चौगुले म्हणाले, आत्तापर्यंत वर्षानुवर्षे आपल्या देशावर अनेक परकीय आक्रमणे होत राहिले.ब्रिटिशांनी राज्य केले. हजारो क्रांतीकारकांच्या बलिदाना नंतर आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले आहे. आज आपण स्वातंत्र्याचे ७५ वे अमृत महोत्सवी वर्ष साजरे करत आहोत. मात्र आज देखील आपल्या देशात अशा बोगस कंपन्या जनतेची आर्थिक फसवणूक व लूट करत आहेत. अशी जनतेची लूट होत असताना आम्ही बघू शकत नाही,म्हणूनच असे प्रकार थांबावेत म्हणून श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या वतीने जनजागृती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
याप्रसंगी संघटनेच्या वतीने कोरोना काळात, महापूरात, समीर वानखेडेंना दिलेला पाठिंबा, बांगलोर मध्ये झालेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या विटंबने बाबात कर्नाटकच्या मुख्यमंत्री यांना भेटून दिलेले निवेदन या बाबत नितीन चौगुलेंनी माहिती दिली. यावेळी बोलताना ते म्हणाले, ज्यांची फसवणूक झाली आहे त्यांनी तक्रार देण्यास पुढे यावे. आम्ही श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या वतीने पुर्णपणे सहाय्य करू असे आश्वासन त्यांनी दिले.
यावेळी आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख साहेब हे मार्गदर्शन करताना म्हणाले, नोव्हेंबर २०२१ पासून आत्तापर्यंत फसवणूक होऊनसुद्धा लोकांनी त्या बाबत तक्रार केलेली नाही. काही लोक तक्रार घेऊन येतात मात्र फिर्याद देण्यास तयार होत नाहीत, असेही ते म्हणाले. यावेळी अशा अनेक बोगस कंपन्यांची नावे त्यांनी वाचून दाखवली. लोकांचा असा गैरसमज आहे की पोलीस ठाण्यात किंवा कोर्टात गेले की गुंतवलेले पैसे परत मिळणार नाहीत. मात्र असे काही होत नाही, तुम्ही गुन्हे दाखल करा. आम्ही कडक कारवाई करू असे आवाहन पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी केले.तसेच त्यांनी याआधी झालेल्या आर्थिक घोटाळ्याची माहिती दिली. इमू घोटाळा, कडकनाथ प्रकरणातील घोटाळा, ऑनलाइन लोन फ्रॉड यासंदर्भात त्यांनी माहिती दिली. कडकनाथ घोटाळ्यात आढळलेल्या दोषींवर एका रात्रीत MPID Act लावून कारवाई केली अशी माहिती त्यांनी दिली.
याप्रसंगी मार्गदर्शन करताना सायबर सेल च्या प्रतिनिधींनी सायबर फ्रॉड कसे होतात. इन्स्टंट लोन द्वारे कशी लूट केली जाते याबाबत माहिती दिली. हनी ट्रॅप द्वारे होणारी फसवणूक व फसवणूक होऊ नये म्हणून घ्यायची काळजी बाबत त्यांनी मार्गदर्शन केले. त्याबाबत असलेले कायदे, कलमं याबाबत माहिती दिली. आपल्या कुटुंबातील सदस्यांचे फोटो, लेडीज चे फोटो सोशल मीडियावर टाकू नका अशी विनंती त्यांनी यावेळी केली. आपण प्रवासाला जाताना आपले लोकेशन सोशल मीडियावर टाकू नका असेही आवाहन त्यांनी केले.
शेअर मार्केट मध्ये होणाऱ्या घडामोडी बाबत सविस्तर माहिती अक्षय जोशी(CA) यांनी दिली. शेअर मार्केट मध्ये शॉर्टकट ने फायदा होत नाही. इंटरनेट द्वारे पुर्ण शेअर मार्केट ची माहिती घेण्याचा सल्ला यावेळी त्यांनी दिला.
याप्रसंगी प्रसिद्ध उद्योजक सतिश मालू यांनी या मेळाव्यात सर्वांना मार्गदर्शन केले. उद्योजक बनण्यासाठी किंवा पैसे मिळवण्यासाठी अशा बोगस कंपन्यामध्ये इनवेस्टमेंट करून शॉर्टकट मारू नये असे ते म्हणाले. यापेक्षा स्वतःचे भांडवल स्वतःच्या व्यवसायात गुंतवून कष्ट करून पैसे मिळावा असे ते म्हणाले. यावेळीBVG ग्रुप चे हणमंतराव गायकवाड, Quick Heal चे फाउंडर कैलाश काटकर या यशस्वी मराठी उद्योजकांची उदाहरण त्यांनी दिले.
श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान काळाची गरज असे कौतुकास्पद वक्तव्य प्रसिद्ध उद्योजक मनोहरजी( काकाजी) सारडा यांनी यावेळी मेळाव्यात मार्गदर्शन करताना केले.जिथे श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान तिथे मी असेही ते म्हणाले.
यावेळी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन दादा कडणे यांनी केले. यावेळी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूकदार, एजंट, नागरिक बंधू भगिनी या मेळाव्यास उपस्थित होते.