भुईबावडा घाटातील संरक्षक भिंत कोसळली कोट्यवधींचा खर्च,पण कामांचा दर्जा सुमारच
प्रतिष्ठा न्यूज /तुकाराम पडवळ
गगनबावडा : कोकणचे प्रवेशद्वार कोल्हापूर – तरळे राष्ट्रीय महामार्गावरील करूळ घाट दुपदरीकरणासाठी तब्बल सहा महिन्यांपासून बंद असल्यामुळे या मार्गावरील बरीचशी वाहतूक भुईबावडा घाटातून वळविण्यात आली आहे. परंतु, हा घाटमार्गही आता वाहतुकीस धोकादायक बनत चालला आहे. भुईबावडा घाटातील संरक्षक भिंतीचे बांधकाम यावर्षीच्या उन्हाळ्यात करण्यात आले होते. परंतु काँक्रीटची नवीन संरक्षक भिंत कोसळली असून, या भिंतीलगत रस्त्याला मोठ्या भेगा पडल्या आहेत. त्यामुळे रस्ताही खचण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
त्यामुळे हा घाटमार्गही वाहतुकीस धोकादायक बनत चालला आहे. उन्हाळ्यात बांधलेली ही संरक्षक भिंत कोसळल्यामुळे कामाच्या दर्जाविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, वाहनचालकांतून तीव्र नापसंती व्यक्त केली जात आहे.
दरम्यान खचलेल्या ठिकाणी बॅरेल उभी केली
दरम्यान, बांधकाम विभागाने खचलेल्या संरक्षक भिंतीच्या ठिकाणी बॅरेल उभी केली आहेत. परंतु त्याच बॅरेलच्या बाजूला रस्त्याला भेगा पडलेल्या ठळकपणे दिसून येत आहेत. त्यामुळे अक्षरशः जीव मुठीत धरून भुईबावडा घाटातून प्रवास सुरू आहे.
मागील दोन वर्षांत भुईबावडा घाटात कोट्यावधी रुपयांची कामे झाली. परंतु, कामे निकृष्ट झाली असल्याचे
पाहायला मिळत आहेत. त्यामुळेच कोट्यवधींचा निधी खर्च पडूनही भुईबावडा घाटमार्ग असुरक्षितच असल्याची भावना वाहनचालकांमध्ये आहे.