जनसंवादातून सांगली स्मार्ट सिटी करण्यासाठी विधीमंडळात सांगलीचा आवाज उठवणार : ‘संवाद सांगलीसाठी’ उपक्रमात सांगलीकरांनी व्यक्त केलेला विश्वास सार्थ ठरविणार :पृथ्वीराज पाटील यांनी दिला सांगलीकरांना शब्द
प्रतिष्ठा न्यूज
सांगली दि.८ : संवाद सांगलीसाठी उपक्रमांतर्गत थेट भेटीत सांगलीकर मोकळेपणाने समस्या मांडत आहेत. विकसित सांगली कशी असेल याबद्दल मौलिक मार्गदर्शन करत आहेत. याचा उपयोग समस्यामुक्त आणि भविष्यातील विकसित सांगली कशी करता येईल याचा आराखडा तयार करण्यासाठी मला सांगलीकरांचे मार्गदर्शन व सहकार्य लाखमोलाचे ठरणार आहे. यामुळे जनसंवादातून सांगली स्मार्ट सिटी करण्यासाठी उर्जा व आत्मविश्वास लाभत आहे.नागरिकांनी सांगलीचा आवाज म्हणून माझ्यावर व्यक्त केलेला विश्वास सार्थ ठरवल्याशिवाय शांत बसणार नाही. जनतेच्या अडचणी व सूचनांची आम्ही गंभीर नोंद घेतली आहे. सांगली भविष्यात क्लीन व हेल्दी सिटी म्हणून देशाच्या नकाशावर झळकेल असा विश्वास पृथ्वीराज पाटील यांनी व्यक्त केला आहे. विश्रामबाग चौकात ‘संवाद सांगलीसाठी’या उपक्रमांतर्गत सांगलीकरांशी संवाद साधताना ते बोलत होते.
यावेळी अनिकेत इरळे, समीर मगदूम, पंकज कांबळे, महावीर अक्कोळे, झाकीर तांबोळी, श्री. पांडेकर, अमित पेंडुरकर, प्रा. अनिल व स्नेहा वैद्य, विनायक सुतार, श्री. कुरणे, रमेश खरात इ. नी संवादात भाग घेताना सांगलीच्या मूलभूत प्रश्नावर बोलताना सांगलीचे रस्ते, पाणी, आरोग्य, ड्रेनेज लाईन, रोजगार निर्मिती, वहातूक नियंत्रण, औद्योगिक विकास, क्रिडा संकुल, मैदाने व उद्याने इ. बाबतीत सडेतोड मते मांडली आणि पृथ्वीराज पाटील हेच विधीमंडळात सांगलीचा आवाज बनू शकतात असा विश्वास व्यक्त केला. संवाद सांगलीसाठी उपक्रमाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून यामधून निश्चितच सांगलीसाठी रचनात्मक कार्य होणार असा विश्वास नागरिकांतून व्यक्त होत आहे.