चिमुकल्या हातानी दिला ‘ स्वच्छतेतून समृद्धीकडे ‘ जाण्याचा मंत्र
प्रतिष्ठा न्यूज/ तुकाराम पडवळ
गगनबावडा : कालच ऐतिहासिक व आध्यात्मिक वारसा लाभलेली गगनगडावरील दत्त जयंती झाली. हजारो भाविक आले होते. त्यापैकी अनेक भक्तानी प्लास्टिकच्या पिशव्या,कागद, प्लास्टिक बाटल्या आदि टाकाऊ वस्तू इतस्तत: फेकल्याने गगनबावडा येथील सर्व रस्त्यांच्या कडेला कोंडाळ्याचे स्वरूप आले होते. हे चित्र परशुराम विद्यालय व कस्तुरबा गांधी विद्यालयातील चिमुकल्यांना पाहवले नाही. त्यांनी तो परिसर स्वतः स्वच्छ केला. आणि ‘ ‘ ‘स्वच्छतेतून समृद्धीकडे’ जाण्याचा मंत्र दिला. एवढेच नाही तर ऐतिहासिक गगनगडावर जाऊन तेथील स्वच्छता करण्याचा निर्णय घेतला.
‘ स्वच्छता’ शब्द वाचताच मनात सौंदर्य फुलते. स्वच्छतेने मन प्रसन्न राहते. या स्वच्छतारूपी सौंदर्याची आराधना करण्याची सवय अंगी बाळगण्यास शिकवण्याचे मोलाचे काम शाळा करते. परशुरामचे प्राचार्य, कस्तुरबाच्या गृहप्रमुख, व त्यांचे सर्व शिक्षक वर्ग याबाबतीत नेहमीच अग्रेसर असतात. समृद्ध भारताचे निर्माण मध्ये महत्त्वाचे पाऊल हे स्वच्छता आहे. यासाठी आपण स्वतः बरोबर आपला परिसर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी अंगी बाळगणे महत्त्वाचे आहे. हा संदेश चिमुकल्यानी आपल्या कृतीने दिला आहे.