प्रतिष्ठा न्यूज

इस्रायलवरील आक्रमणातून बोध घेऊन भारताने राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने पाऊल उचलणे आवश्यक : ब्रिगेडियर हेमंत महाजन

‘सेक्युलरिजमच्या आड हमासचे समर्थन’ या विषयावर विशेष संवाद !

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : भारताने रशिया-युक्रेन युद्धाच्या आव्हानाला कुटनीती वापरून एका संधीमध्ये रूपांतर केले. त्याचप्रमाणे सध्या इस्रायलवर हमासने केलेल्या आक्रमणाचा बोध घेऊन भारताने राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने प्रत्येक पाऊल उचलणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन युद्ध सेवा मेडल प्राप्त ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी केले. ते हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘सेक्युलरिजमच्या आड हमासचे समर्थन’ या विषयावरील विशेष संवादात बोलत होते.
या वेळी ब्रिगेडियर हेमंत महाजन पुढे म्हणाले की, 7/10 ला हमास या आतंकवादी संघटनेने इस्रायलवर आक्रमण करणे हे इस्रायलच्या ‘मोसाद’ या विश्वभर प्रसिद्ध असलेल्या गुप्तचर संघटनेचे मोठे अपयश आहे. इस्रायलने गुप्तचर क्षेत्रात तांत्रिक बाबींवर अधिक भर दिला आणि मानवी गुप्तचर क्षेत्राकडे दुर्लक्ष केले. गाझापट्टीतून इस्रायलमध्ये प्रतिदिन कामासाठी येणार्‍या 15 ते 20 हजार नागरिकांनी 2 ते 3 वर्षे हमाससाठी गुप्तचर म्हणून काम केले. इस्रायलची युद्धासाठी सिद्धता नसल्याचे लक्षात आल्यावर त्यांच्यावर हमासने आक्रमण केले. इस्रायलच्या उच्च तंत्रज्ञानावर आधारित ‘आयर्न डोम’ यंत्रणेला हमासच्या अल्प तंत्रज्ञानाने पराभूत केले. इस्रायलचे शहरीकरण झाल्याने तेथील नागरिकांची लढण्याची क्षमता अल्प झालेली आहे. इस्रायलने त्याच्या शत्रूला कमी लेखले. शत्रूचा उद्देश समजून घेतला नाही, तर इस्रायलमधील लोक आपापसात लढत राहिले. इस्रायलच्या या सर्व चुकांमध्ये भारताने खूप काही शिकण्यासारखे आहे. भारतियांमध्ये राष्ट्रभक्ती निर्माण करणे आणि स्वा. सावरकर यांच्या शिकवणीनुसार कठीण परिस्थितीला सामोरे जाण्याची नागरिकांमध्ये सिद्धता निर्माण केली पाहिजे.
या वेळी सैन्यदलातील सेवानिवृत्त मेजर सरस त्रिपाठी म्हणाले की, भारताला पाकिस्तान, चीन या परकीय शत्रूंबरोबरच देशाअंतर्गत कार्यरत असलेले नक्षलवादी, पाकसमर्थक, आतंकवादी आदी देशविरोधी शक्तींच्या विरोधात लढले पाहिजे. हे जग मुत्सद्देगिरीवर (‘डिप्लोमसी’वर) चालते. ज्याची जशी वागणूक आहे, त्यानुसारच त्याच्याशी वागावे लागते. ज्यांनी भारताचे दोन तुकडे केले, त्यांना भारतात आज विशेषाधिकार देण्यात येत आहेत. यासाठी देशातील काही कायदे बदलले पाहिजेत. चांगले कायदे आणले पाहिजेत. हिंदु धर्म मानवतावादी आहे; मात्र आतंकवादाचे समर्थन केले जाऊ शकत नाही. हमास ही एक राक्षसी संघटना आहे आणि इस्रायलने तिला संपवले पाहिजे. हिंदूंच्या देवदेवतांच्या हातीही शस्त्रे आहेत. यासाठी प्रत्येक हिंदूने आत्मरक्षणासाठी सरकारमान्य शस्त्र बाळगले पाहिजे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.