कवठे एकंद येथे ग्रामस्वच्छता करून रोवली लग्नाची मुहूर्तमेढ.. समाजसेवक प्रदीप माळी यांचा उपक्रम
प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : लग्न समारंभ म्हणटला की धार्मिक रूढी परंपरा,मानपान,आहेर एक आणि अनेक अशा चालीरीती पाहायला मिळतात,परंतु आपल्या एकुलत्या एक मुलाच्या लग्नाची सुरुवात गावाकडे ग्राम स्वच्छतेच्या माध्यमातून करून सामाजिक कार्यकर्ते प्रदीप माळी व त्यांच्या माळी कुटुंबियांनी एक सामाजिक संदेशाची मुहूर्तमेढच रोवली.छत्रपती संभाजीनगर येथे दारूबंदी व्यसनमुक्ती कार्यात नेहमी अग्रेसर असणारे महाराष्ट्र शासनाचा व्यसनमुक्ती कार्याबद्दल आदर्श पुरस्कार प्राप्त असणारे प्रदीप माळी हे छत्रपती संभाजीनगर येथे नोकरी निमित्ताने कार्यरत आहेत.हायफाय शहरात राहूनही कवठे एकंद गावी त्यांची नाळ जोडलेली आहे.नोकरी बरोबरच माळी तंबाखूजन्य पदार्थ विरोधी व्याख्यान जनजागृती,एकांकिका,पथनाट्य, समुपदेशन अशा उपक्रमात हिरीरेने सहभागी असतात.व्यसनमुक्त समाज घडवण्यासाठी त्यांनी शेकडो व्याख्याने राज्यभरात दिली आहेत.त्यांच्याबरोबर त्यांच्या पत्नी सौ.लता माळी याही पतीला समाजकार्याला हातभार लावतात.त्यांच्या मुलाच्या लग्नाच्या निमित्ताने गावाकडे आल्यावर परिसरातील गरज लक्षात घेऊन गल्लीतील विजय,राजु दिलीप,अरविंद,पांडु,सुनिल,अविना श.या युवकांना सोबत घेऊन गटार स्वच्छतेची मोहीमच सुरू केली. यावेळी मुलाच्या लग्नाची धांदल गडबड असताना देखील सामाजिक कामाची तळमळ जागृत ठेवत स्वच्छता कामाने लग्नाची मुहूर्तमेढच माळी यांनी रोवली.माळी कुटुंबीयांचा हा स्वच्छतेचा पायंडा समाजात सामाजिक भान जोपासण्यास नक्कीच प्रेरणा देणारा आहे.