प्रतिष्ठा न्यूज

अहमदनगर च्या नावात मोठा बदल … अहमदनगर ऐवजी आता अहिल्यानगर !

प्रतिष्ठा न्यूज / ज्ञानेश्वर गायकर पाटील
अहमदनगर : राज्य सरकारने आज मंत्रिमंडळ बैठकीत दोन महत्त्वाचे निर्णय घेतले असून , वेल्हे तालुक्याचे नामांतर करुन आता राजगड हे नाव अस्तित्वात येईल तर इतिहास असलेले अहमदनगर जिल्ह्याचे विभाजन अपक्षित असताना जिल्ह्याचे नाव ऐन निवडणूकत नामांतर केले असून आता जिल्ह्याचे नाव अहिल्यानगर असे असेल . नगर जिल्ह्यातील चोंडी हे गाव पुण्यशील अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थान आहे . अहमदनगर हे शहर एके काळी निजामाची राजधानी होती . जाणून घेऊ या थोडा इतिहास .
पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा जन्म याच अहमदनगर जिल्ह्यातील चोंडी ता.जामखेड या गावी झाला. त्यांचे वडील मानकोजी शिंदे हे चौंडी ता.जामखेड या गावाचे पाटील होते. अहिल्यादेवींचे बालपण याच गावात गेले. त्या शिवभक्त होत्या. पुढे मराठा साम्राज्याचे इंदौर संस्थानच्या खंडेराव होळकर यांच्याशी त्यांचा विवाह झाला. त्या सुभेदार राजे मल्हारराव होळकर यांच्या त्या सून होत. त्यांच्या नंतर अहिल्यादेवी ह्या मध्य भारताच्या माळवा राज्याच्या महाराणी म्हणून २८ वर्ष राज्यकारभार सांभाळला. त्यांनी भारत देशात ठिकठिकाणी मंदिरे, धर्मशाळा, घाट, पाणपोई- विहिरी, बारवे, अन्नछत्रे उभारले.
निजामशाहीचा संस्थापक निजाम अहमद होय. मध्ययुगीन कालखंडात दक्षिण हिंदुस्थानमध्ये ज्या पाच शाह्या होऊन गेल्या त्यामध्ये अहमदनगरची निजामशाही ही स्वराज्याच्या पायाभरणीसाठी पूरक ठरली होती. हिंदुस्थानामध्ये मुस्लिम सत्तेची सुरुवात झाल्यानंतर विविध भागांत त्यांनी आपली सत्तास्थाने निर्माण केली होती. त्यासोबत अनेक वास्तूंची निर्मितीही झाली होती. आपल्या साम्राज्यविस्ताराचा एक भाग म्हणून त्यांनी संबंधित राजधानीला वा वास्तूला स्वतःची वा परिवाराची नावे दिली. त्यानुसार अहमदनगरच्या निजामशाहीला हे नाव मिळाले. या निजामशाहीचा इतिहास मोठा रोमांचकारी आहे.

अहमदनगर हे मूळचे शहर नसून प्रसंगानुसार त्याची उभारणी झालेली आहे. देवगिरीवर स्थापन झालेल्या बहामनी राज्यात निजाम उल मुल्क पदवी धारण करणारा मलिक अहमद हा मूळचा हिंदू असून परभणी जिल्ह्यातील पाथरीच्या बहिरंभट कुलकर्णीचा नातू होता.त्याच्या वडिलांनी-तिमाभटाने मुस्लिम धर्म स्वीकारला होता. मलिक अहमद हा तिमाभटाचा मुलगा असून बहामनी साम्राज्यात पराक्रम गाजवत तो सुभेदार पदापर्यंत पोहोचला. बहामनी साम्राज्याचा दिवाण महंमद गावानमुळे विस्तार झाला, परंतु राज्यकारभारावरील पकड ढिली होत गेल्याने बहामनी साम्राज्यातील प्रत्येक सुभेदाराने स्वतःचे स्वतंत्र राज्य स्थापले.

मलिक अहमदने जुन्नर या ठिकाणी राजधानी ठेवून स्वतःचे निजामशाही नावाचे स्वतंत्र राज्य झाल्याचे घोषित केले. तेव्हा बहामनीच्या फौजांनी मलिक अहमदवर आक्रमण केले. तेव्हा भिंगार गावाजवळील इमाम घाटात त्याने बहामनी सैन्याचा दारुण पराभव केला. विजय मिळवून देणारा परिसर म्हणून याच ठिकाणी २८ मे १४९० रोजी त्याने एका शहराची स्थापना केली. त्याला नाव दिले अहमदनगर. विशेष म्हणजे मलिक अहमदच्या फौजेत असणाऱ्या राजा, सेनापती, प्रधान आणि काझी अशा सर्वांच्याच नावात अहमद होते.

आपल्या मूळ पुरुषाच्या नावावरून या घराण्याने बहिरंभटावरून बहिरी नाव धारण केले तर पुढे प्रत्येक राजाने स्वतःला निजामशहा हा किताब लावला तर त्यांच्या साम्राज्याला निजामशाही म्हटले गेले. मलिक अहमद निजामशहा बहिरीने त्या ठिकाणी एका भुईकोट किल्ल्याची पायाभरणी केली आहे. त्यानुसार अहमदनगरमध्ये अंडाकृती किल्ला बांधला. या किल्ल्याचा परीघ मैलाचा असून किल्ल्याच्या भोवती मोठा खंदक, तर बाजूने २२ मोठे बुरूज आहेत. किल्ल्यामध्ये पाण्याकरिता गंगा, जमुना, मछलीबाई व शक्करबाई नावाच्या ४ विहिरी असून सोनमहल, मुल्कआबाद, गगन महल, मीना महल, बगदाद महल यांसारखे महाल बांधले. दिवसेंदिवस यात वाढ होत गेली.

तत्कालीन कालखंडात या किल्ल्याच्या आजूबाजूला एका स्वतंत्र शहराची निर्मिती झाली. त्या भागाला कोटबाग निजाम म्हटले गेले. या कोटबाग निजामचे वैभव एवढे मोठे,अतिभव्य होते की,याची तुलना कैरो व पॅरिससारख्याभव्य शहरांसोबत व्हायची.

अहमदनगरच्या निजामशाहीत एकूण ११ निजाम होऊन गेले आहे. त्यापैकी चौघांचे खून झाले. १२५ वर्षे ही राजसत्ता टिकली. निजाम या शब्दाचा अर्थ होतो जमिनीची व्यवस्था पाहणारा, त्यामुळे संबंधित सुभेदाराला निजाम उल मुल्क ही पदवी असायची. अशी पदवी असणाऱ्या दोन सरदारांनी स्वतःचे राज्य निर्माण केले. पहिले १४९०ची अहमदनगरची निजामशाही आणि दुसरी १७२४ची हैदराबादचे निजामशाही. या दोन सत्तांचा परस्पर काहीही संबंध नाही.

अहमदनगरच्या निजामशाहीत मलिक अंबरसारखा शूर आणि धोरणी प्रधान होऊन गेला. त्याने जमीन महसूल व्यवस्था सुधारली. शिवाय शत्रूशी लढण्याकरिता गनिमी काव्याच्या युद्धनीतीचा अवलंब केला. म्हणून त्याला गनिमी कावा युद्धनीतीचा जनक म्हटले जाते. स्वराज्याला पोषक ठरणारी पार्श्र्वभूमी याच निजामशाहीने दिली. कारण छत्रपती शिवाजीवे मूळ पुरुष बाबाजी भोसलेंपासून आजोबा मालोजीराजे, वडील शहाजी भोसलेंसह सर्व भाऊबंद याच निजामशाहीत पुढे आले/आहे. एवढेच नाही तर मालोजीराजे यांनी इंदापूर या ठिकाणी तर चुलते शरीफजी यांनी भातोडी (नगरजवळील)या ठिकाणी झालेल्या युद्धात निजामासाठी प्राणार्पण केले.

स्वराज्य संकल्पक शहाजीराजे घडले तेच मुळी निजामशाहीत होत. मलिकअंबर नंतर त्यांनी निजामशाही वाचविताना मुर्तुजा निजामाला घेऊन परांडा या ठिकाणी गादी ठेवून स्वतंत्रपणे कारभार चालविला. शाहजहानने स्वतः निजामशाही विरोधात मोहीम आखली नसती तर शहाजीराजांनी स्वतःच स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली असती. भोसले घराण्याबरोबर याच निजामशाहीत सिंदखेडचे जाधव, फलटणचे निंबाळकर घराणे नावारूपाला आले. या एकत्रितपणामुळेच विवाहबंधनांतून नवीन कार्याची निर्मिती झाली. भोसले व घोरपडे हे घराणे मूळ एकच असून या घराण्यातील कर्णसिंहाला निजामाने राजे घोरपडे-बहाद्दर नावाचा किताब दिला होता. तेव्हापासून घोरपडे हे नाव उदयास आले. सोलापूर, परांडा, औसा, उदगीर, धारूर,देवगिरी यांसारखे अनेक भुईकोट किल्ले निजामशाहीतच पुढे आले. साम्राज्यविस्तार करताना आदिलशहाबरोबर झालेल्या युद्धात इब्राहिम निजामशहा ५ ऑगस्ट १५९५ रोजी नळदुर्ग येथे मरण पावला परंतु निजामशहा आणि आदिलशहाचे संबंध सुरळीत राहिल्याने पहिल्या बुऱ्हाणशहाला (१५०८ ते १५५३) इस्माईल आदिलशहाची मुलगी दिली होती. तर हुसेन निजामशहाची मुलगी चांदबिबी ही अली आदिलशहाला दिली होती. या शाही विवाहात सोलापूरचा किल्ला आंदण म्हणून वापरला गेला.

निजामशाहीची देणगी म्हणजे हुसेन निजामशहाच्या काळात चिकबुरूज नावाने जगातील भव्य असणारी तोफ. ५५ टन वजनाची ही तोफ बरेच दिवस परंड्याच्या किल्ल्यात होती. पुढे परंडा आदिलशहाकडे आल्यानंतर ऑगस्ट १६३२ साली ती विजापूरला गेली. तोफ वाहून नेण्याकरिता १० हत्ती व ४०० बैल लागायचे. सोलापूर व विजयनगरवर याचा वापर झाला. विजापूरच्या सर्जा बुरुजावर मुलुखमैदान नावाची ही तोफ पर्यटकांचे आकर्षण आहे.शेवटचा निजामशहा मुर्तुजा (तिसरा) हा मोगलांच्या कैदेत गेला आणि १६३६ साली हे निजामशाही साम्राज्य बुडाले.

तेव्हापासून १७५९ पर्यंत अहमदनगर मोगलांच्या ताब्यात होते. शाहिस्तेखान, मिर्झाराजे जयसिंग आणि औरंगजेबाने छत्रपती शिवाजीविरोधात मोहीम आखण्यापूर्वी बरेच दिवस नगरमध्ये मुक्काम ठोकला होता/आहे. मोगलांचा विजापूरकडे जाणारा रस्ता म्हणजे औरंगाबाद, अहमदनगर, परंडा, काटी, जरखेड, मोहोळवरून पुढे जायचा. छत्रपती शिवाजी महाराजांनाही नगरचा किल्ला ताब्यात राहावा अशी इच्छा होती. म्हणून त्यांनी ३० मे १६६४ साली आक्रमण केले होते. मध्ययुगीन कालखंडातील फेरिस्तासारखा इतिहासकार निजामशाहीतच घडला गेला.

मराठा साम्राज्याच्या विरोधात मोहीम काढणारा औरंगजेबशेवटी परत जाण्याकरिता निघाला तेव्हा १७०६ ते १७०७ या दरम्यान अहमदनगरमध्येच राहिला होत.त्यामुळे त्याच्या कैदेत असणाऱ्या छत्रपती शिवरायांच्या पत्नी सकवारबाई, शंभूराजांच्या पत्नी महाराणी येसूबाई, मुलगा शाहूसह अनेक मराठ्यांनी अहमदनगरचा पाहुणचार घेतलेला आहे. एवढेच नाही तर सतत २६ वर्षे दक्षिणेच्या मोहिमेवर असणारा औरंगजेब वार्धक्यामुळे २० फेब्रुवारी १७०७ रोजी अहमदनगरमध्येच वारला आहे.

पुढे १७५९ साली मराठ्यांनी हा किल्ला जिंकून घेतल्यानंतर तो महादजी शिंदेच्या जहागिरीत होता. मराठी साम्राज्यात घडलेल्या घडामोडींमुळे नाना फडणिसांना नगरच्याच किल्ल्यात ठेवण्यात आले होते. पुढे १८१७ रोजी तो ब्रिटिशांनी जिंकल्याने त्यांनी अहमदनगरला लष्करी छावणी उभारली. ती आजही कायम आहे. पहिल्या महायुद्धानंतर जर्मनीचे कैदी याच किल्ल्यात ठेवण्यात आले होते. ब्रिटिशांमुळे शहराच्या आधुनिकीकरणाला चालना मिळाली तर १९४२ला स्वतंत्र भारताच्या निर्मितीसाठी काँग्रेसने आंदोलन उभे केले तेव्हा अनेक राजकीय कैदी नगरच्या किल्ल्यात डांबण्यात आले. पैकी भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंचा मुक्काम दोन वर्षे होता. यादरम्यान त्यांनी ‘डिस्कवरी ऑफ इंडिया’ नावाचा ग्रंथ इथेच लिहिला. याच ठिकाणी तुरुंगात असताना आंबेडकरांनी ‘थॉट ऑफ पाकिस्तान’ व मौलाना आझादांनी ‘गुबारेखातीर’ लिहून काढला आहे.

छत्रपती शिवरायांचे एक विश्वासू सेनापती खंडेराव कदम नगरजवळील प्रवरा देवळालीचे रहिवासी. अशा रीतीने अहमदनगरची निजामशाही म्हणजे हिंदू-मुस्लिमांचा मिलाफ होता. एवढेच नाही तर अल्लाउद्दीन खिलजीनंतर दक्षिणेतील हिंदूंची तलवार म्यान झाली होती. तिला पुन्हा प्रतिष्ठा मिळवून देण्याचे काम निजामशाहीत घडून आले. एका अर्थाने अहमदनगरची निर्मिती स्वतः मलिक अहमदने केलेली असल्याने या शहराच्या नामांतराचा विषय कधी चर्चेला आल्याचे दिसत नाही.

निजामाच्या सहिष्णुतेमुळेच अनेक मराठा सरदार तर पुढे आलेच शिवाय ज्ञानेश्वररांपासून ते शेख महंमदापर्यंतचे अनेक संत याच परिसरात निर्माण झाले. म्हणूनच संतकवी दासगणूंनी अहमदनगरविषयी लिहिताना म्हटले आहे की, मराठेशाहीचे जननस्थान पुण्यभूमी महापावन आहे.

मराठ्यांच्या कर्तृत्वाच्या उदयकाली विठोजी भोसले, मालोजी भोसले, लखुजी जाधवराव निंबाळकर, पवार, बाजी कदमराव हे निजामशाहीचा चौथा सुलतान मुर्तझा निजामशाह आणि पुढे मलिक अंबर ह्याच्या पदरी सेवेत होते. देवळाली प्रवरा येथील सरदार बाजी कदमराव ह्यांना साल्हेर आणि मुल्हेर हे किल्ले, किल्ल्यावर फितवा करून मिळवून दिल्याबद्दल देवळाली प्रवरा आणि रुई ही गावे इ.स. १५८० साली इनाम मिळाली होती. पुढे विजापूरकारांशी लढताना बाजी कदमांचा बंकापूर ( कर्नाटक ) येथे मृत्यू झाला. आजही त्यांचे वंशज हे देवळाली प्रवरा येथे आहेत. पुढे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेवेत हे घराणे आले. खंडेराव कदम आणि तिसरे बाजी हे शिवाजी महाराजांचे अत्यंत विश्वासू सरदार होते. ह्यांच्याकडे राजगड किल्ल्याची तटसरनौबती होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी दक्षिण दिग्विजय मोहिमेत तामिळनाडू येथील वली गंडापुराम हा किल्ला जिंकला. ह्या किल्ल्याची किल्लेदारी कदमांकडे होती. छत्रपती राजाराम महाराजांच्या जिंजी मोहिमेतही कदमांनी स्वराज्यासाठी आपले पूर्ण योगदान अर्पण केले. पानिपतच्या लढाईत ह्या घरातील सात पुरुष कामी आले. आजही कदमांकडे पारंपरिक आणि दुर्मिळ अशी जुनी शस्त्रे जपलेली आहेत. त्यांत धोप तलवारी, गूर्ज, कट्यारी, ढाली, बिचवे, हस्तिदंती गुप्त्या, भाले, शिवकालीन शिवराया आणि इतर ऐतिहासिक वास्तू ही आहेत.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.