महिला शक्तीमुळे मताधिक्य वाढणार : संजयकाका पाटील ; भाजपचा सांगली महापालिका क्षेत्राचा महिला मेळावा उत्साहात
प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : महिलांनी घरोघरी जाऊन प्रचार करावा. महिला शक्तीमुळे लोकसभा निवडणुकीत मताधिक्य वाढणार आहे. मताधिक्य वाढल्याने केंद्रात चांगली संधी मिळणार आहे, असे मत खासदार संजयकाका पाटील यांनी व्यक्त केले. भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित महिला मेळाव्यात ते बोलत होते.
सांगली लोकसभा प्रचार नियोजनासाठी भारतीय जनता पार्टी सांगली मिरज आणि कुपवाड महानगर जिल्हा महिला मोर्चा सर्व महिला पदाधिकारी, प्रमुख कार्यकर्त्यांचा महिला मेळावा हरीपूर येथे सुखरूप मंगल कार्यालयात उत्साहात पार पडला.
भाजपा पश्चिम महाराष्ट्र समन्वयक शेखर इनामदार, ज्येष्ठ नेते दिपकबाबा शिंदे म्हैसाळकर, महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ संचालक निताताई केळकर, भाजपा प्रदेश सरचिटणीस स्वातीताई शिंदे, ज्योतीताई संजयकाका पाटील, शिवानीताई प्रभाकरबाबा पाटील, माजी नगरसेवक भारतीताई दिगडे, सुमनताई खाडे, मंजीरीताई गाडगीळ, माजी महापौर संगिता खोत, महिला मोर्चा शहर अध्यक्षा माजी नगरसेवक गीतांजली ढोपे – पाटील, कवठेमहांकाळ च्या नगराध्यक्ष सिंधुताई गावडे, सिमा पाटील, हरीपूर च्या सरपंच राजश्री तांबवेकर यांच्या सह महापालिका क्षेत्रातील महिला उपस्थित होत्या.
खासदार संजयकाका पाटील म्हणाले, ही निवडणूक जनतेने हातात घेतली आहे. महिलांनी घरोघरी जाऊन प्रचार केल्यास जनजागृती होईल. मोदीजींचे विचार आणि पक्षाने केलेले काम सर्वत्र पोहचेल. महिला शक्तीमुळे मताधिक्य वाढवण्यासाठी मदत होईल आणि केंद्रात आपल्याला मोठी संधी मिळणार आहे. त्यामुळे महिला शक्ती महत्त्वाची आहे.
जनसंपर्क अभियान, महिला बुथ सक्षमीकरण, शक्ती वंदन कार्यक्रम, विकसित भारत संकल्पना या विषयावर लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा करण्यात आली.