धुळीने तासगावकर त्रस्त ; व्यापाऱ्यांचे प्रचंड हाल
प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : सलग पडून गेलेल्या पावसाने उघडीप दिल्यानंतर आता तासगाव शहरात धुळीचे साम्राज्य पसरले असून यामुळे व्यापारी, स्थानिक नागरिक आणि दुचाकीधारक हैराण झाले आहेत.दोन आठवड्यापूर्वी पावसाने संततधार धरली होती.त्यामुळे रस्त्यावर पाणी साचून अनेक ठिकाणी रस्त्यांची चाळण झाली असल्याने प्रशासनाने त्याठिकाणी मुरूम,क्रश घालून खड्डे मुजवले होते.आता पावसाने पूर्णता उघडीप दिल्यानंतर शहरातील प्रमुख रस्त्यांवर धुळीच्या साम्राज्याने कब्जा केला आहे.सांगली नाका ते विटा नाका,स्टॅन्ड चौक ते भिलवडी नाका रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर माती असल्याने धूळ उडून नागरिकांच्या घरात,दुकानात,वाहनचालकांच्या डोळ्यात जात आहे.सांगली नाका ते विटा नाका दरम्यानच्या रस्त्यावर प्रचंड माती असून मोठे व अवजड वाहन गेल्यास धूळ उडून ही धूळ रस्त्याच्या आजूबाजूला असलेल्या दुकानात,घरांमध्ये जात असल्यामुळे व्यापारी आणि स्थानिक नागरिकांना या धुळीचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.दिवसभर अवजड वाहनांची वर्दळ असल्याने उडणारी धूळ सरळ दुकानात आणि घरात येते.दिवसातून शेकडो लहान-मोठी वाहने वावरतात.या रस्त्यावर बँका,व्यापारी संकुले असल्याने शहरासह आजूबाजूच्या वीस ते पंचवीस खेड्यातील नागरिक विविध कामासाठी येथे येतात.सकाळी ६ ते रात्री ९ वाजेपर्यंत शहरातील रस्ते गजबजलेले असतात.वाहनामुळे धुळीचे प्रचंड लोट उडत असल्याने रस्त्यावरील आजूबाजूच्या दुकानांत धुळीचे लोट घुसून दुकानातील वस्तू,माल खराब होत आहेत.तसेच रस्त्याने येणाऱ्या-जाणाऱ्या पादचाऱ्यांना धुळीचा प्रचंड त्रास होतो आहे.यावर पालिका प्रशासनाने उपाययोजना करण्याची मागणी व्यापारी आणि नागरिक करत आहेत.
धुळीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात.
नागरिकांना सर्दी,खोकला,कफ होणे,धाप लागणे,घशात दुखणे,असे त्रास होत आहेत.प्रचंड धुळीमुळे श्वसनाचे विकार वाढीस लागले आहेत.हवेतील धुळीचे प्रमाण सरासरीपेक्षा वाढल्याने सर्दी खोकल्यापासून दम्यापर्यंत अनेक तक्रारी वाढत आहेत.