अॅड. विवेकानंद घाटगे, बबनराव रानगे यांना महात्मा गांधीजी विचार जीवन गौरव पुरस्कार जाहीर ; 2 ऑक्टोंबरला महात्मा गांधी जयंतीदिनी होणार वितरण
प्रतिष्ठा न्यूज
कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विचारांचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी कार्यरत असणाऱ्या महात्मा गांधीजी नवविचारमंचचा यावर्षीचा नावाजलेला, स्वाभिमानाचा, अभिमानाचा महात्मा गांधीजी विचार जीवन गौरव पुरस्कार बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अॅन्ड गोव्याचे माजी चेअरमन आणि सुप्रसिद्ध कायदेतज्ञ अॅड. विवेकानंद घाटगे, मल्हार सेना महाराष्ट्र राज्याचे सरसेनापती आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बबनराव रानगे यांना जाहीर झाला असून बुधवार दि. 2 ऑक्टोंबर, 2024 रोजी सकाळी 11:00 वा., राजर्षी शाहू स्मारक भवन, मुख्य सभागृह, कोल्हापूर या ठिकाणी महात्मा गांधीजी यांच्या जयंती दिनी पुरस्कार वितरण समारंभ होणार असल्याची माहिती महात्मा गांधीजी नवविचारमंचचे अध्यक्ष प्रा. टी. के. सरगर आणि पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष अनिल म्हमाने यांनी पत्रकार परिषदेत दिली.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे सर्वधर्मसमभाव आणि अहिंसावादी तत्त्वज्ञान घेऊन कार्यरत असणाऱ्या सन्माननीय व्यक्तींना जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते. यावर्षी कायद्याच्या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल अॅड. विवेकानंद घाटगे आणि सामाजिक क्षेत्रात दखलपात्र भूमिका घेऊन कार्यरत असल्याबद्दल बबनराव रानगे या दोघांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
पुरस्कार वितरण समारंभास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन समन्वयक अंतिमा कोल्हापूरकर यांनी केले आहे.
पत्रकार परिषदेला ॲड. करुणा विमल, विश्वासराव तरटे, डॉ . शोभा चाळके, सिकंदर तामगावे, शर्वरी पाटोळे, अर्हंत मिणचेकर, अश्वजित तरटे, नमिता धनवडे उपस्थित होते.