सांगली जिल्ह्यातील दोन रेल्वे उड्डाण पूलांचे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण; रेल्वे उड्डाणपुलामुळे मिरज शहराच्या वैभवात भर – पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे
प्रतिष्ठा न्यूज
सांगली, दि. 17 : मिरज कृष्णाघाट रोडवरील बांधण्यात आलेल्या रेल्वे उड्डाणपुलामुळे मिरज शहराच्या वैभवात भर पडली आहे, असे प्रतिपादन राज्याचे कामगार मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी केले.
महाराष्ट्रातील नऊ उड्डाणपूलांचे लोकार्पण आणि नागपूर शहरातील पाच उड्डाणपूलांचे भूमिपूजन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नागपूर येथून आयोजित कार्यक्रमात ऑनलाईन पध्दतीने करण्यात आले. यावेळी मंचावर सर्वश्री आ. चंद्रशेखर बावनकुळे, कृष्णा खोपडे, विकास कुंभारे, अॅड आशिष जायस्वाल, टेकचंद सावरकर, महारेलचे व्यवस्थापकीय संचालक राजेशकुमार जायसवाल उपस्थित होते. याचे प्रसारण मिरज येथे बांधण्यात आलेल्या रेल्वे उड्डाणपूलाच्या ठिकाणी करण्यात आले. मिरज येथे कार्यक्रम ठिकाणी पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी भेट देवून नागरिकांशी संवाद साधला. यावेळी रेल्वेचे असिस्टंट जनरल मॅनेंजर एम. भट्ट, सुशांत खाडे, मोहन व्हनखंडे, तसेच पदाधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे म्हणाले, सुमारे 36 कोटी रूपये खर्च करून मिरज येथे रेल्वे उड्डाणपूल बांधण्यात आला आहे. विहीत वेळेत या पूलाचे काम पूर्ण करण्यात आल्याचे सांगून पूलामुळे वाहतूक सुरळीत होणार असल्याचे ते यावेळी म्हणाले.
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज सांगली जिल्ह्यातील सांगली जिल्ह्यातील मिरज जंक्शन रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे फाटक क्र. 465 येथील दोन मार्गिका उड्डाणपूल प्रकल्पाची लांबी – 718.75 मी. – किंमत रु. 35.19 कोटी व भिलवडी रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे फाटक क्र. 117 येथील दोन मार्गिका उड्डाणपूल प्रकल्पाची लांबी – 1020.30 मी. – किंमत रु. 88.78 कोटी या रेल्वे उड्डाण पूलाचे ऑनलाईन उद्घाटन करण्यात आले. यामुळे वाहतूक सुरळीत व जलद होण्यास मदत होणार आहे.