शुन्य ते वीस पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याची कार्यवाही थांबली पाहिजे – संभाजी ब्रिगेड नांदेड
प्रतिष्ठा न्यूज/वसंत सिरसाट
नांदेड : राज्यातील 0 ते 20 विद्यार्थी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याची कार्यवाही त्वरित थांबवावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा एका निवेदनाद्वारे संभाजी ब्रिगेडच्या वतीने सहाय्यक जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना पाठविण्यात आले आहे.
कोविड 19 संसर्गजन्य आजाराचा राज्याच्या अर्थव्यवस्थेवरील परिणामाबाबत वित्तीय उपाययोजना करण्यासाठी घातलेली पदभरती बंदीबाबतचे पत्र मा. आयुक्त (शिक्षण) आणि मा. शिक्षण संचालक महाराष्ट्र राज्य यांना निर्गमित केले आहे. सदर पत्रातील मुद्दा क्र. 4 नुसार 0 ते 20 विद्यार्थी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. महात्मा ज्योतिराव फुले यांनी हंटर कमिशन समोर मांडले होते. व छत्रपती राजश्री शाहू महाराजांनी आपल्या संस्थानात त्याची अंमलबजावणी केली होती. तेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेच्या माध्यमातून मांडले असून आरटीइ कलम 2009 नुसार बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्काची तरतूद आहे. शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणात वस्ती तेथे शाळा हे धोरण शासनाने अवलंबले आहे. त्यानुसार वस्ती, वाड्या, व तांडे, अशा दुर्गम भागात शाळा सुरु करण्यात आलेल्या होत्या. त्यामुळे निश्चितच शाळाबाहा विद्यार्थी प्रमाण कमी झाले आहे. कमी विद्यार्थी संख्या असलेल्या शाळांचे प्रमाण अतिशय दुर्गम तसेच वाडी, वस्ती, तांडे व आदिवासी बहुल क्षेत्रात अधिक आहे. या शाळा बंद झाल्यास तेथील मुलांच्या व विशेषतः मुलींच्या शिक्षणावर त्याचा विपरीत परिणाम होऊन ते कायमचे शिक्षण प्रवाहा पासून दूर लोटले जातील कारण काही आदिवासी भागात पक्के रस्ते नाहीत. गाव, वस्तीच्या बाजूला नद्या, नाले असल्यामुळे पावसाळ्यात या भागाचा अनेक दिवस संपर्क तुटतो. कुठलेही दळणवळणाची साधने उपलब्ध नाहीत. त्यामुळे या बाबीचा गांभिर्याने विचार करावा. विद्यार्थी संख्ये अभावी कोणतीही शाळा बंद करण्यात येऊ नये. तसेच, विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता विकासासाठी शिक्षक भरती करावी. शिक्षकांकडील अशैक्षणिक कामे काढून टाकावीत, पुरेशा भौतिक सुविधा उपलब्ध करण्यात याव्यात. यासारख्या उपाययोजना करण्यात याव्यात असे निवेदन संभाजी ब्रिगेड च्या वतीने किनवट सहाय्यक जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना पाठविण्यात आले. यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख तथा पत्रकार बालाजी पाटील सिरसाट तालुकाध्यक्ष सचिन पाटील कदम विधानसभा अध्यक्ष शिवा पाटील पवार, पांडुरंग बादड नरेश संकनेनिवार, रितेश मंत्री, विशाल शिंदे आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.