सावळज येथील शेतकरी महावितरणच्या विराधात आक्रमक,सुरळीत व आठ तास अखंडित वीज मिळावी या मागण्यांसाठी महावितरणच्या विरोधात करणार धरणे आंदोलन
प्रतिष्ठा न्यूज / अनिल शिंदे
सावळज दि. २ : येथील महावितरणच्या भोंगळ कारभारा विरोधात सावळज येथील शेतकरी त्रस्त झाला असून सुरळीत न होणाऱ्या वीजपुरवठ्या अभावी येथील शेतकरी मेटाकुटीस आला असून उध्वस्त होणारी शेती उघड्या डोळ्यांनी बघण्याची वेळ येथील शेतकऱ्यांवरती आली आहे.
सावळज येथील बसवेश्वरनगर, पवारखोरा, अन्य काही भागात गेल्या दोन वर्षांपासून शेतीसाठी फक्त चार तासच वीजपुरवठा केला जात आहे, तो सुध्दा पूर्ण दाबाने होत नसून वारंवार वीज खंडित होत असते त्यामुळे येथील शेतकरी हैराण झाला आहे, लहरी निसर्गाशी मात करीत तळ हातावरील फोडाप्रमाणे सांभाळलेली शेती विजेअभावी उध्वस्त होत आहे हातातोंडाशी आलेल्या द्राक्षबागा व इतर पिके कशी वाचवायची हा यक्ष प्रश्न येथील शेतकऱ्यांच्या समोर आ वासून उभा आहे.
याबाबत येथील शेतकरी आक्रमक झाला असून आज शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने महावितरणच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन आपल्या मागण्या पोटतिडकीने मांडल्या तसेच तातडीने याबाबत योग्य ती दखल घेऊन संबंधित शेतकऱ्यांना विना खंडित व पूर्ण दाबाने आठ तास वीजपुरवठा करावा अन्यथा महावितरणच्या विरोधात लवकरच धरणे आंदोलन करण्यात येईल अशा आशयाचे निवेदन सावळज महावितरणच्या कनिष्ठ अभियंता सौ देशपांडे मॅडम यांना देण्यात आले यावेळी रोहित जाधव, अनिल भाऊ शिंदे,शिवाजी निकम, अनिल कोरे, माणिकराव जाधव, शिवाजी घाटगे, शिवाजी पाटील,तसेच सावळज परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.