सुहास पंडित यांच्या काव्यसंग्रहाचे उत्साहात प्रकाशन
प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : कालिदास दिनाच्या पूर्वसंध्येला कवी सुहास रघुनाथ पंडित यांच्या ‘प्रेम रंगे, ऋतूसंगे’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन ज्येष्ठ साहित्यिका सौ.उज्वला केळकर यांच्या हस्ते करण्यात आले.श्री.वैजनाथ महाजन यांच्या अध्यक्षतेखालील संपन्न झालेल्या या समारंभास डाॅ.विष्णू वासमकर व श्री.दयासागर बन्ने यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले.
सौ.उज्वला केळकर यांनी सुहास पंडित यांच्या कवितांचे अंतरंग उलगडून दाखवताना शांतपणे वाहणा-या झ-यासारख्या लयबद्ध कविता असे म्हटले आहे.श्री.दयासागर बन्ने यांनी पंडित यांच्या कविता म्हणजे निसर्ग आणि प्रेम यांच सुंदर चांदणं आहे. अर्थविपुलता, अर्थचमत्कृती वृत्त बद्ध कविता हे सुहास पंडित यांच्या कवितांचे वैशिष्ट्य असून ती तत्त्वप्रधान आहे या शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या. डाॅ.विष्णू वासमकर यांची प्रस्तावना या कवितासंग्रहाला लाभली आहे.त्यांनी आपल्या भाषणात कवितांचे वाड्मयीन सौंदर्य स्पष्ट केले.
अध्यक्षीय भाषणात श्री.वैजनाथ महाजन यांनी समकालीन काव्याचा उल्लेख करून श्री.पंडित यांच्या काव्याचे वेगळेपण दाखवून दिले.कविता ही जगण्याची प्रक्रिया असून कविता करता येत नसते,ती व्हावी लागते याची जाणीव करून दिली.चांगली कविता हा एक शोध असतो.कवी कोणत्या पद्धतीने ध्यास घेतो हे महत्वाचे आहे असेही त्यांनी नमूद केले.
या प्रकाशन समारंभास ज्येष्ठ साहित्यिक श्री.वसंत केशव पाटील, आनंदहरी,डाॅ.भीमराव पाटील, सौ.वर्षा चौगुले,मंजुषा मुळे,अर्चना मुळे,सुनिता गाडगीळ, वंदना हुळबत्ते,मुबारक उमराणी, विकास जोशी, अजित पुरोहित,गौतम कांबळे व अन्य साहित्यिक तसेच काव्य प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.सौ.बिल्वा अकोलकर यांनी सर्वांचे स्वागत केले तर श्री.शितल कुलकर्णी यांनी आभार मानले.प्रा.संतोष काळे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.