तासगाव व्यापारी संकुलात शेतकऱ्यांनी भरवला बाजार… प्रशासन आणि व्यापारी भूमिकेवर ठाम…
प्रतिष्ठा न्यूज / किरण कुंभार
तासगाव : तासगावच्या बागणे चौक तें बागवान चौक असा दैनंदिन व आठवडा बाजार स्थलांतरित करण्याचा निर्णय पालिकेचे प्रशासक, मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील यांनी घेतला.त्याला व्यापाऱ्यांनी विरोध केला असून रस्त्यावरच भाजीपाला विकणार अशी भूमिका घेतली आहे.आज गुरुवारचा आठवडा बाजार असून,व्यापाऱ्यांनी पुकारलेल्या बेमुदत संपा मुळे बाजार होणार कीं नाही असा प्रश्न नागरिकांना पडला होता,परंतु वरचे गल्ली एकीकरण समितीच्या सदस्यांनी तालुक्यातील शेतकऱ्यांना पाठिंबा देऊन आजत्यांना एकत्रित करून छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुलमध्ये बाजार भरवला.पूर्वी पासून तासगावात सोमवार व गुरुवार आणि आता नव्याने सुरु झालेला शनिवारी आठवडा बाजार भरतो.शनिवारचा बाजार वगळता दोन्ही बाजार बागणे चौकापासून आत जाणाऱ्या रस्त्यावर भरतात,शिवाय दैनंदिन बाजारही याच रस्त्यावर भरतो.भर चौकात आणि रस्त्यावर बाजार भरत असल्याने वाहतुकीची प्रचंड कोंडी होऊन या बाजारात भुरट्या चोऱ्या,महिलांची छेड,टवाळखोरांचा त्रास असल्याच्या अनेक तक्रारी झाल्या आहेत. मागील रविवारी दोन केळी विक्रेत्यांमध्ये जागेच्या वादातून हाणामारी झाली. एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न झाला.त्यातून धारदार शस्त्राने एकावर खुनी हल्ला झाला.सकाळी – सकाळी झालेल्या या हल्ल्यामुळे शहर हादरले.या हल्ल्यानंतर बाजार स्थलांतराचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला.पालिकेने सुमारे 4 कोटी रुपये खर्चून छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुल उभारले आहे.या संकुलमध्ये दुकान गाळ्यांबरोबरच भाजीपाला मार्केटही उभारले आहे. या मार्केटमध्ये बाजार कट्टे करण्यात आले आहेत.या बाजार कट्ट्यांचा लिलाव होऊन व्यापाऱ्यांना हे कट्टे देण्यातही आले आहेत.मात्र थोडे दिवस हे व्यापारी बाजार कट्ट्यावर बसले. त्यानंतर पुन्हा मूळ ठिकाणी रस्त्यावर बाजार विक्री सुरू झाली.
मात्र रविवारी जागेच्या वादातून कोयता काढण्यात आला.खुनी हल्ला झाला.त्यामुळे भविष्यात कायदा व सुव्यवस्था बिघडू नये,रस्त्यावरच्या बाजारमुळे वाहतूक कोंडी होऊ नये, महिलांना त्रास होऊ नये,यासाठी दैनंदिन व गुरुवारचा आठवडा बाजार स्थलांतरित करण्याचा निर्णय झाला. व्यापाऱ्यांनी मात्र व्यापारी संकुलमध्ये आमचा धंदा होत नाही,असे म्हणत बाजार स्थलांतरीत करण्यास विरोध करून बेमुदत बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांनी कोणताही विरोध न करता छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुलमध्ये आपला भाजीपाला विकण्यास सुरुवात केली आहे.यावेळी शहरातील वरचे गल्ली एकीकरण समितीच्या सदस्यांनी याप्रकरणात शेतकऱ्यांची साथ दिली आहे,त्यांनी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याची भूमिका घेतली आहे.