खाडे पब्लिक स्कूलच्या विद्यार्थिनींनी रक्षाबंधन दिनासाठी बॉर्डरवरील सैनिकांना पाठवल्या राख्या
प्रतिष्ठा न्यूज/ योगेश रोकडे
मिरज : मालगाव येथील दास बहू उद्देशीय विश्वस्त संस्था संचलित मातोश्री तानुबाई दगडू खाडे पब्लिक स्कूलच्या विद्यार्थिनींनी आपल्या शिक्षकांच्या मदतीने बॉर्डर वरील आर्मी सैनिकांना राख्या पाठवल्या. भारत देश हा संस्कृती प्रिय देश आहे. येथे अनेक सण उत्सव साजरे केले जातात. यामागे त्यांची सामाजिक सांस्कृतिक भावना असते. यातूनच एकमेकांविषयी प्रेम, माया, लोभ त्याचबरोबर राष्ट्रीय एकात्मतेची भावना निर्माण होते व ती जोपासली जाते.
पण या धावपळीच्या जीवनात हे सण उत्सव मागे पडत आहेत. त्याचे महत्त्व कमी होत आहेत. ही परिस्थिती बदलावी व मुलांना या सर्वांची जाणीव व्हावी म्हणून खाडे पब्लिक स्कूलने रक्षाबंधन या भाऊ बहिणीचे प्रतीक समजलेल्या सणाचे औचित्य साधत विद्यार्थिनींकडून राख्या बनवून घेतल्या व त्या बॉर्डर वरील आपल्या सैनिकांना पाठवल्या. या उपक्रमामागे स्कूलचा हेतू सैनिकांचे असणारे महत्त्व अधोरेखित करणे हा होता. अशी माहिती स्कूलच्या कार्यकारी अधिकारी स्वाती खाडे यांनी सांगितली. यावेळी आपल्या देशाच्या सीमेवर असणाऱ्या जवानांमुळेच आपण सुरक्षित असल्याचेही विद्यार्थ्यांना सांगितले. या प्रेमापोटी मुख्याध्यापिका सुप्रिया पाटील व शिक्षकांच्या मदतीने विद्यार्थिनींनी राख्या बनवून बोर्डरवरील सैनिकांना पाठवल्या व त्या जवनांनीही आनंदाने आपल्या हातात बांधून रक्षाबंधन सण साजरा केला.
या उपक्रमाच्या नियोजनासाठी शिक्षक विक्रांत गौंड, योगेश रोकडे व इतर शिक्षकांचे सहकार्य लाभले. तसेच संस्थेचे अध्यक्ष पालकमंत्री तथा कामगार मंत्री महाराष्ट्र राज्य सुरेश भाऊ खाडे, संचालिका सुमन खाडे, सुशांत खाडे यांचे विशेष मार्गदर्शन मिळाले.