कवठेएकंद करांना दसर्याचे वेध
प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : कवठे एकंदचें ग्रामदैवत श्री बिराडसिद्ध देवस्थानच्या वतीने नवरात्र उत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन मोठ्या उत्साहात केले जाते.विजयादशमी दसरा या दिवशी होणारा श्रींचा पालखी सोहळा व संपूर्ण राज्यात प्रसिद्ध असणारी आतषबाजीची पूर्वतयारी सध्या जोरात सुरु आहे.
श्रींचा पालखी सोहळा व आतषबाजी कार्यक्रम सुरळीत संपन्न व्हावा यासाठी देवस्थान ट्रस्ट,यात्रा कमिटी, भाविक, ग्रामस्थ यांच्या कडून नेटके नियोजन केले जात आहे. आतषबाजीच्या पाश्र्वभूमीवर कवठेकरांना आता दसर्याचे वेध लागले आहेत.नवरात्रोत्सव निमित्ताने श्री सिद्धराज महाराज मंदिरात घटस्थापना,पूजा अर्चा,श्री चा अभिषेक,तसेच दैनंदिन आरती कार्यक्रम भक्तीभावात होत आहेत. उत्सवामुळे महाराजांच्या दर्शनासाठी पहाटे पासून भाविकांची गर्दी होत आहे.सिध्दराज विद्युत रोषणाई मंडळाचे पुढाकाराने मंदिर परिसरात आकर्षक विद्यूतरोषणाई करण्यात आली आहे.दसरा उत्सवाच्या कामांची सुरूवात करण्यासाठी कच्चा साहित्याची जमवा जमव केली जात आहे.घराघरात स्वच्छता,सफाई , रंगरंगोटी करून विजया दशमी ची तयारी केली जात आहे. ठिकठिकाणच्या दारू शोभा मंडळाच्या प्राथमिक बैठका होत आहेत.घटस्थापनेपासून गल्लोगल्ली च्या दारू शोभा मंडळानी तयारी सुरू केली आहे.शासनस्तरावर आतषबाजीचा उत्सव शांततापूर्ण, विनाअपघात व्हावा यासाठी प्रयत्न केले जात आहेत.ग्रामस्थ,दारू शोभा मंडळानी त्यादृष्टीने धोकादायक प्रकारावर बंदी घातली आहे.एकूणच गावची परंपरा अधिक चांगल्या प्रकारे टिकवून सुरक्षितरित्या आतषबाजीचे सादरीकरण होण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.पालखी सोहळा अधिक चांगल्या प्रकारे करण्यासाठी यात्रा कमिटी,ग्रामपंचायत,देवस्थान ट्रस्टी, भाविक,ग्रामस्थांकडून कामाची आवराआवर करण्यात येत आहे.
पाऊस झाल्याने थांबलेली शेती कामे दसऱ्या अगोदर पूर्ण करण्यास शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. गावातील गटारांची सफाई काम केले जात आहे.युवक मंडळी कडून स्वागत कमानी,नवीन टी शर्ट छपाई,स्वागत फलक अशा कामांसाठी कार्यकर्ते कामाला लागले आहेत.त्यामुळे कवठे एकंदकरांना दसर्या चे वेध लागून हालचाली गतीमान झाल्या आहेत.
चौकट:आर्थिक मंदीत महागाईचे सावट…
गणेश उत्सवाच्या धामधूमीनंतर कवठे एकंद येथे प्रत्येकाला दसर्याचे वेध लागतात.शेतकरी वर्ग शेती कामे आटोपून घेत आहेत.यंदाच्या वर्षी खरीप हंगाम वाया गेला आहे. प्रामुख्याने सोयाबीन,मूग,उडीद अशा पिकावर खोडमाशीचा घाला आल्याने उत्पादन आले नाही.त्यामुळे आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागत आहे. थकित ऊस बिल मिळत नाही, उत्पादन खर्चाच्या मानाने दुध दर वाढ नाही.पैशाच्या अभावी दसर्याच्या उत्सवावर परिणाम दिसत आहे. बाजारपेठेत मंदीचे सावट असल्याने आर्थिक चणचण असल्याने सर्वसामान्याना मंदीचा फटका बसत आहे.वाढती महागाई त्यात उत्पन्नात घट यामुळे शेतकरी वर्ग अडचणीत आहे.द्राक्ष उत्पादक शेतकरी छाटणी च्या कामाला लागले आहेत.त्यामुळे खर्चात वाढ होत आहे.वर्षांचा मोठा सण असून तो साजरा करायचाय यादृष्टीने भाविक मंडळींनी आर्थिक तजवीज करून तयारी केली असल्याचे दिसून येत आहे.