शालेय पोषण आहार पुरवठा करणाऱ्या ठेकेदारावर फौजदारी दाखल करा.. मनसेची शिक्षण अधिकाऱ्यांकडे तक्रार..
प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : शालेय पोषण आहार योजना महाराष्ट्र राज्यात शालेय शिक्षण विभागाच्या शासन निर्णय क. पूप्राशा / १०९५ / २१३४ / प्राशि- २ दिनांक २२/११/१९९५ अन्वये शालेय पोषण आहार योजना इ. १ ते ५ वी साठी टप्याटप्याने सुरू केली.तसेच पुढे शासन निर्णय क. शापोआ – २००८ प्र.क्र / २६४ प्राशि-४ दि. ०८/०८/२००८ अन्वये इयत्ता ६ वी ते ८ वी साठी लागू करण्यात आली आहे.याचे कारण विद्यार्थ्याना दिल्या जाणाऱ्या आहारात त्यांच्या शरीराला पोषक मूल्ये व समतोल आहार मिळावा तसेच विद्यार्थ्याची शालेय उपस्थिती वाढावी यासाठी ही योजना शासनाकडून सुरू करण्यात आली आहे.परंतु सांगली जिल्हयामध्ये मात्र या योजनेचा मधुसुदन एजन्सी मार्फत जिल्हयामध्ये मोठया प्रमाणावर धान्यांची चोरी केली जात आहे.ही चोरी मधुसुदन एजन्सीने नेमलेली सब ठेकेदार गणेश सुरेश पाटील रा. वज्रचौंडे अष्टविनायक ट्रान्सपोर्ट यांच्या मार्फत चालू आहे.अष्टविनायक ट्रान्सपोर्ट यांच्या ४०७ टाटा टॅम्पो या जवळपास ३० गाडया असून त्यांच पासिंग आर.टी.ओ.नियमानुसार २ ते २.५ टनाचे आहे.परंतु या सर्व गाडयामध्ये सबठेकेदार गणेश सुरेश पाटील यांच्याकडून ५ ते ६ टन माल भरून बेकायदेशीर वाहतुक केली जाते.या गाडयामध्ये शालेय पोषण आहाराचे तांदुळ,गहू,हरभरा डाळ, वाटाणा,मूग,छिलका,मसूर डाळ, मोहरी, चवळी, भगवती, मीठ, हळद, त्यामधील बराच माल निकृष्ट दर्जेचा असतो.सांगली जिल्हयातील सर्वच शाळेमध्ये २ महिन्यातुन एकदा या शालेय पोषण आहाराचे वाटप केले जाते.त्यावेळी ज्या ठिकाणी लोकवस्ती नाही किंवा लोकांची वर्दळ नाही अशा ठिकाणी हा ठेकेदार चालकांकडून गाडी थांबवून बुम मार्फत प्रत्येक पोत्यातून ५ ते ६ किलो धान्य बेकायदेशीररित्या काढले जाते.
हा बेकायदेशीर रित्या चोरलेला माल खाजगी गाडीमध्ये कॉसिंग केला जातो व तो माल इतर ठिकाणी विकला जातो.एका गाडीतून एकावेळी जवळपास १ ते १.५ टन माल चोरला जातो. सांगली जिल्हयामध्ये तासगांव— आटपाडी – जत तालुक्यामध्ये याचे प्रमाण मोठे आहे.या गंभीर प्रकरणाबाबत एल.सी.बी.कडून गेल्यावर्षी मोठी कारवाई करण्यात आली होती.या कारवाईचा संबंधित ठेकेदारावर कोणताही परिणाम झालेला दिसून येत नाही.तरी या प्रकरणात आपण स्वतः लक्ष देऊन ४ ते ५ दिवसात योग्य ती कारवाई करावी.अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आपल्या कार्यालयासमोर खळखट्याक आंदोलन करण्यात येईल व त्यावेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यास आपण व आपले कार्यालय जबाबदार असेल असा इशारा मनसे नेते अमोल काळे यांनी शिक्षण अधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद सांगली यांना निवेदनाद्वारे दिला आहे.