संस्कारक्षम पिढी घडविणे हेच खरे मोठे आव्हान : डॉ. दिलीप पटवर्धन; कृषिभूषण दादासाहेब (आण्णा)ठिगळे यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने पुरस्कार सोहळा उत्साहात
प्रतिष्ठा न्यूज
लेंगरे प्रतिनिधी : एका बाजूला वाढत चाललेला प्रगतीचा वेग तर दुसऱ्या बाजूला माणसाची होत चाललेली ससेहोलपट अशी विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे इथून पुढच्या काळात सुखी आणि समाधानी रहावे असे वाटत असेल तर प्रत्येकाने आपले भाव विश्व् सांभाळलेच पाहिजे. विशेषतः आपण ज्या समाजातून आलो त्या समाजाचे काहीतरी देणे लागतो याची जाण आणि भान असले पाहिजे. राज कृषी व ग्रामीण विकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून प्रा. संजय ठिगळे व राजेश ठिगळे आपल्या वडिलांच्या नावाने विविध उपक्रम राबवून ते खऱ्या अर्थाने समाजाचे उतराई होत आहेत. त्यांच्या स्तुत्य उपक्रमांचा आदर्श समाजातील विविध घटकांनी घ्यावा असे मत डॉ. दिलीप पटवर्धन यांनी व्यक्त केले.
सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील लेंगरे गावचे सुपुत्र कृषिभूषण दादासाहेब (आण्णा)ठिगळे यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने राज कृषी व ग्रामीण विकास प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारे कृषिरत्न व सेवार्थी पुरस्काराच्या वितरणाचा कार्यक्रम जीवन विद्या मिशन मुंबईचे माजी अध्यक्ष डॉ. दिलीप पटवर्धन व भारती विद्यापीठाचे सहकार्यवाह प्राचार्य डॉ. एम. एस. सगरे यांच्या शुभहस्ते लेंगरे येथील श्रीराम कृष्णाई मंगल कार्यालयात संपन्न झाला.
उपस्थितांचे स्वागत करताना प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. संजय ठिगळे म्हणाले की, नोकरीच्या निमित्ताने गावापासून व आई वडिलांपासून दूर असलेल्या लोकांनी गावाची नाळ तोडता कामा नये.
अध्यक्षपदावरून बोलताना डॉ. म. शि. सगरे म्हणाले की, अलिकडच्या काळात राजा राणी आणि राजकुमार संस्कृतीमुळे कुटुंब व्यवस्था उध्वस्थ होते की काय असे वाटत असतानाच दादासाहेब ठिगळे यांच्या स्मृतिप्रिथ्यर्थ समाजाभीमुख उपक्रम राबीवले जात आहेत. यातून एक वेगळा आशावाद निर्माण होतो आहे. याप्रसंगी ठिगळे आण्णांच्या अनेक आठवणींना जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रम कदम, बंडोपंत राजपाध्ये,डॉ. सिकंदर जमादार, प्रशांत सावंत सौ. मालन मोहिते, शारदा शेटे यांनी उजाळा दिला. गुरुवर्य मा. सुदाम नाना शिंदे व सदाशिव विष्णू मोरे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
उपस्थितांचे आभार राजेश ठिगळे यांनी मानले. कार्यक्रमास सुहास भैया बाबर,प्राचार्य डॉ. संजय पोरे,धर्मेंद्र पवार, संपतराव पवार, अँड. सुभाष पाटील, प्रा. श्रीकृष्ण मोहिते, श्रीरंग शिंदे त्याचबरोबर शैक्षणिक,सामाजिक व राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.