पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न तात्काळ सोडवावा: लोकसभा विशेष अधिवेशन घ्यावे : खा.संजय जाधव यांची पंतप्रधानांकडे मागणी
प्रतिष्ठा न्युज/ राजू पवार
नांदेड/ परभणी : संसदेचे विशेष अधिवेशन बोलावून त्यात कायदा करून मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न तात्काळ सोडवा, अशी मागणी परभणीचे खासदार संजय (बंडू) जाधव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे.
खा. संजय जाधव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, मराठा समाजाला आरक्षण द्यावे अशी या समाजाची गेल्या अनेक दिवसांपासूनची मागणी आहे. सध्या संपूर्ण महाराष्ट्रात मराठा समाजाचे आरक्षणाच्या मागणीसाठी शांततेच्या मार्गाने आंदोलन चालू आहे. या आंदोलनाचे लोन खेडोपाडी पसरत चालले असून श्री मनोज जरांगे पाटील यांच्यासह महाराष्ट्रात गावोगावी मराठा समाजाचे उपोषण चालू आहे.
विशेष म्हणजे धनगर समाजाचेही आपल्या आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभर शांततापूर्ण मार्गाने आंदोलन चालू आहे. सरकारने या दोन्ही समाजाच्या आरक्षणाची बाब अतिशय गांभीर्याने घ्यावी. म्हणजेच समाजाच्या सहनशीलतेचा अंत न पाहता लवकरात लवकर संसदेचे विशेष अधिवेशन बोलावून त्यात कायदा करावा व मराठा समाजाला त्यांच्या हक्काचे आणि कायम टिकणारे आरक्षण द्यावे अशी मागणी खा.संजय जाधव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली आहे.