सुखकर प्रवासासाठी हेल्मेटचा वापर व वाहतुकीचे नियम पाळणे आवश्यक – पोलीस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव
प्रतिष्ठा न्यूज
सांगली दि. 19 : दैनंदिन जीवनाशी निगडित असलेला प्रवास सुखकर होण्यासाठी सर्वांनी हेल्मेटचा वापर व वाहतुकीचे नियम पाळणे आवश्यक आहे. राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान फक्त अभियाना पुरते मर्यादिन न राहता वर्षभर राबवावे, असे मत पोलीस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव यांनी हेल्मेट जनजागृती रॅलीच्या सांगता कार्यक्रम प्रसंगी व्यक्त केले.
राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान कार्यक्रमाच्या अनुषंगाने उपप्रादेशिक परिवहन कार्यालय माधवनगर येथे हेल्मेट जनजागृती रॅलीला मान्यवरांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून सुरूवात करण्यात आली. सुरक्षित वाहने चालवा, अपघात टाळा, हेल्मेट वापरा, वाहतुकीचे नियम पाळा, असा संदेश देत सांगली पोलीस दल व उपप्रादेशिक परिवहन विभाग यांच्या वतीने सांगली शहरातून हेल्मेट जनजागृती रॅली काढण्यात आली. या रॅलीची सांगता नूतन पोलीस मुख्यालयाच्या प्रांगणात झाली.
या कार्यक्रम प्रसंगी पोलीस उपअधीक्षक (होम) डॅनियल बेन, सहाय्यक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रशांत साळे, मोटर वाहन निरीक्षक असिफ मुलानी, महाराष्ट्र राज्य वाहतूक सुरक्षा दलाचे उप-महामादेशक अनिल शेजाळे, उद्योजक सुरेश इरळे, वाहन निरीक्षक प्रशांत इंगोले, आकाश गालींदे, रवींद्र सोळंकी, रोहन सासणे तसेच सहा. मोटर वाहन निरीक्षक कल्याणी बावडेकर, अश्विनी पाटील, नेहा बारपटे, योगिता बारपटे उपस्थित होते.