राष्ट्रवादी काँग्रेसचा उपविभागीय कार्यालयावर बैलबंडी मोर्चा
प्रतिष्ठा न्यूज /योगेश अगडे
चंद्रपूर : चिमूर क्रांती जिल्हा, शेतकऱ्यांची नुकसान भरपाई, युवक बेरोजगारांच्या विविध समस्या शासन दरबारी मांडण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे चिमूर शहरात स्थानिक बालाजी देवस्थानासमोरून उपविभागीय अधिकारी कार्यालयावर बैलबंडी मोर्चा काढण्यात आला.
राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार स्थापन झाले. मात्र, मंत्रिमंडळ विस्तार झाला नसल्याने पूरग्रस्त शेतकरी,
नागरिकांच्या समस्या आवासून उभ्या आहेत.
त्यामध्ये चिमूर क्रांतिभूमीला जिल्ह्याचा दर्जा देण्यात यावा, या मुख्य मागणीसह चिमूर, नागभीड तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, भिसी व तळोधी (बा.)ला तत्काळ नियमित तालुका घोषीत करावा, मोखाबर्डी कॅनलचे काम तत्काळ पूर्ण करावे, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या नागरिकांना मदत
द्यावी, अन्नधान्यावरील चिमूर विधानसभा क्षेत्रातील नागरिकांना रोजगार उपलब्ध करून द्यावा, शेतातील वीज पुरवठा नियमित करावा, भिसी चिमूर नेरी या नगराच्या क्षेत्रात गावखेडे जोडण्यात आली. नगर पंचायत व नगर परिषद निर्माण करण्यात आल्या, शासनाच्या वतीने मिळणारी कामे बंद झाली. त्यामुळे एमआरईजीएस योजने अंतर्गत शेतीचे पांदन रस्ते पुन्हा सुरु करण्यात यावे, घरकुलाचा निधी त्वरित मिळावा, भिसी येथे ग्रामीण रुग्णालय देण्यात यावे,इत्यादी मागण्या निवेदनातून करण्यात आल्या. मोर्चात माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे संपर्कमंत्री आमदार प्राजक्त तनपुरे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य, विधानसभा अध्यक्ष रघुनाथ बोरकर, राजीव कक्कड, बेबी उईके, राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस अरविंद रेवतकर, श्रीनिवास शेरकी, नागभीड तालुका अध्यक्ष विनोद नवघडे, जिल्हा सरचिटणीस रमेश कराडे, चिमूर तालुका अध्यक्ष राजू मुरकुटे, रमेश कराडे, अरुण निमजे, सुधाकर कातकर, राजेंद्र आकरे, सय्यद आबिद अली, मुनाफ शेख, भाऊराव डांगे, ज्योती रंगारी, पूजा शेरकी आदीसह जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.