मौजे येलूर ता.कंधार येथे मराठा समाजाचा रस्ता रोको
प्रतिष्ठा न्यूज/ राजू पवार
नांदेड : मनोज जरांगे-पाटील यांची प्रकृती चिंताजनक होत असताना सरकार कोणताच मार्ग काढत नसल्याने मराठा समाज बांधवांनी आक्रमक पवित्रा घेतला असून, कंधार तालुक्यातील मौजे येलूर येथे राष्ट्रीय महामार्ग क्र. १६१वर १६ फेब्रुवारी रोजी सकाळी ७:०० वाजेपासून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून गेल्या 6 दिवसापासून मनोज पाटील जरांगे बेमुदत उपोषणाला बसले आहेत. त्यांना पाठिंबा देण्यासाठी मराठा बांधव बैल- गाडी सह रस्त्यावर येऊन रस्ता रोको आंदोलन केले. ” जरांगे पाटील तुम आगे बढो,हम तुम्हारे साथ है”, आरक्षण आमच्या हक्काचे नाही कोणाच्या बापाचे ” अशा घोषणा देऊन संताप व्यक्त केला. काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.
मराठा समाज बांधवांच्या आरक्षणाच्या संदर्भातील विविध मागण्यांसाठी मनोज जरांगे यांनी अंतरवाली सराटी येथे उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या उपोषणाचा आज पाचवा दिवस असून, मनोज जरांगे यांची प्रकृती खालावली आहे. मात्र, तरीही सरकार या प्रश्नावर कोणताच मार्ग काढत नाही. त्यामुळे आक्रमक झालेल्या समाज बांधवांनी शुक्रवारी सकाळी ७:०० वाजेपासून रास्ता रोको आंदोलन सुरू केले. या आंदोलनामुळे वाहतूक ठप्प झाली होती. एस. टी. महामंडळाची बससेवा देखील ठप्प झाली होती. आरक्षणाचा निर्णय होत नाही तोपर्यंत लढा थांबणार नसल्याचे
कार्यकर्त्यांनी सांगितले. दुपारी १२:०० वाजण्याच्या सुमारास उपविभागीय पोलिस अधिकारी मारोती थोरात, पोलिस निरीक्षक चंद्रकांत जाधव, उपनिरीक्षक गोपाळ इंद्राळे, तुकाराम जुन्ने यांनी आंदोलकांशी चर्चा केली. त्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.