प्रतिष्ठा न्यूज

चौदा वर्षांपासून सहा फुट जट असलेल्या महिलेला अंनिसने केले जटामुक्त! महिला दिन अनोख्या पद्धतीने साजरा

प्रतिष्ठा न्यूज
मिरज प्रतिनिधी : जागतिक महिला दिनाच्या दिवशी बेडगमधील एका चाळीस वर्षीय महिलेची गेल्या चौदा वर्षांपासून असणारी सहा फूट लांबीची आणि तीन किलो वजनाची जट काढून अंधश्रद्धा निर्मूलन समिती सांगलीने महिला दिन अनोख्या पद्धतीने साजरा केला. जटेचा गुंता सोडवून एका अघोरी प्रथेतून एका गरीब महिलेला अंनिसने मुक्त केले.

याबाबत अधिक माहिती अशी की, बेडग तालुका मिरज येथील सुवर्णा पोपट नांगरे ही महिला मोलमजुरी करून आपल्या आईसोबत राहते. देवीचा आदेश म्हणून तिच्या डोक्यामध्ये चौदा वर्षांपूर्वी जट आली. दैवी दहशतीमुळे ती त्यांनी तशीच वाढू दिल्यामुळे आज ती जट सहा फूट लांबीची, तीन किलो वजनाची झाली होती. सुवर्णाची जट काढण्याबाबत तिची आई लिलाताई नांगरे आणि तिचे समुपदेशन रयत सेविका शिक्षिका सरिता उदय माने आणि अंनिसचे कार्यकर्ते राहुल थोरात, डॉ. संजय निटवे, त्रिशला शहा, आशा धनाले यांनी मागील चार दिवसांपूर्वी केले आणि त्यांना जट काढण्यासाठी राजी केले.

आज दुपारी अंनिसच्या कार्यकर्त्या आशा धनाले, त्रिशला शहा, डॉ. सविता अक्कोळे यांनी सुवर्णाच्या जटा कापून या अघोरी अंधश्रद्धेतून तिला मुक्त केले. चौदा वर्षांपूर्वीची जुनाट जट काढल्यानंतर सुवर्णाच्या चेहऱ्यावर हास्य फुलले. हे हास्य बघून अंनिसचे कार्यकर्ते ही आनंदीत झाले.याप्रसंगी सरिता माने यांनी सुवर्णास साडी चोळी देऊन तिचा सन्मान केला. यावेळी अंनिसचे कार्यकर्ते जगदीश काबरे, डॉ संजय निटवे, राहुल थोरात, मालोजीराव माने, कल्याणी माने हे उपस्थित होते.

जटा काढल्यामुळे देवीचा होप होईल किंवा कोणत्यातरी प्रकारचा त्रास होईल याची भीती महिलांनी मनातून काढून टाकली तर आपण या अंधश्रद्धेपासून निश्चितच दूर राहू. कोणाची जट निर्मूलन करायचे असेल तर त्यांनी अंनिसशी संपर्क साधावा असे आवाहन आम्ही करत आहोत असे अंनिसचे कार्यकर्ते राहुल थोरात यांनी सांगितले.

डॉ. संजय निटवे, जगदीश काबरे म्हणाले की, अनेक अनिष्ट प्रथा, रूढी व परंपरा या केवळ अज्ञानातून आणि अंधश्रद्धेतून निर्माण झालेल्या दिसून येतात. स्वच्छतेच्या अभावामुळे, केसांची निगा न राखल्यामुळे केसांचा गुंता वाढतो, त्याकडे दुर्लक्ष झालं की, धूळ, माती साचून हा गुंता वाढून शेवटी सर्व केसांची एकच वजनदार जट तयार होते. मानेला ओझं पेलवयाला त्रास होतो. मान वळवायला त्रास, झोपेला त्रास, नीट झोपता येत नाही, कूस बदलताना त्रास होतो. परंतु हा त्रास सहन करायचा असतो, असा समज रुढी-परंपरेने करून दिलेला आहे. अशी अघोरी परंपरा नाकारली तर काहीतरी नुकसान होणार नाही.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.