शामराव नगरातील मोकळ्या प्लॉटसह तुंबलेली गटारी मोकळी करावी यासाठी लोकहित मंचचे आंदोलन; आमदार खासदारांसह आयुक्तांनी पाहणी करावी : मनोज भिसे
प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : सांगली कोल्हापूर रोड आणि शंभर फुटी रस्त्यालगत असणारा मोठा आणि सर्वसामान्यांची वस्ती असणारा परिसर म्हणजे शामराव नगर हा परिसर कायमच कोणत्या ना कोणत्या कारणाने बातमी ठरतो कारण या परिसराच्या अनेक समस्या आहेत आणि या समस्यांकडे पर्यायाने राजकीय लोकांचं आणि महापालिका प्रशासनाचे ही दुर्लक्ष होत आहे .
दरम्यान आता पावसाला सुरुवात झाली असतानाच पहिल्या एक-दोन पावसामुळेच या परिसरातील मोकळ्या प्लॉटमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साठवून हे प्लॉट म्हणजे छोटी छोटी तळी बनली आहेत .हे पाणी साठवून राहिल्याने त्याला दुर्गंधी सुटली आहे तर या पाण्यात डासांची मोठ्या प्रमाणावर पैदास होत आहे .गटारांची ही अवस्था यापेक्षा वेगळी नाही या ठिकाणची बहुतेक सर्वच गटारं ही तुडुंब भरली असून हे पाणी निचरा होत नाही त्यामुळे लोकांचे आरोग्य धोक्यात आल्याने,आज लोकहित मंचचे अध्यक्ष मनोज भिसे यांच्या नेतृत्वाखाली शामराव नगरातील विविध विस्तारित भागाची पाहणी करून आंदोलन करण्यात आले.
दरम्यान महापालिकेच्या वतीने वेळच्यावेळी या ठिकाणी औषध आणि धूर फवारणी होताना दिसत नसून आरोग्य विभागातील स्वच्छता कर्मचारी प्रामाणिकपणे काम करत नाहीत त्यामुळे या दुर्लक्षित राहत असलेल्या भागाकडे सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ खासदार विशाल पाटील आणि महापालिका आयुक्त शुभम गुप्ता यांनी समक्ष पाहणी करून ठोस अशी उपाययोजना करावी .अशी मागणी लोकहित मंचचे अध्यक्ष मनोज भिसे यांनी केली आहे .
यावेळी राजेश शिरटीकर, ओंकार उदगावकर, शशिकांत पोळ, आकाश कांबळे आदी उपस्थित होते.