बाजार समित्यांमधील ‘मविआ’चे यश राज्यातील जनतेचा कौल दाखवून देणारा-जयंत पाटील
प्रतिष्ठा न्यूज
इस्लामपूर ता.३०: राज्यामध्ये झालेल्या कृषी उत्पन बाजार समित्यांच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने बाजी मारल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शिंदे गट आणि भाजपला खोचक शब्दात टोला लगावला आहे. बाजार समित्यांमधील ‘मविआ’चे यश राज्यातील जनतेचा कौल दाखवून देणारा असल्याचे त्यांनी म्हटले आहे. महाविकास आघाडीच्या वज्रमुठीला भेगा पडल्या अशी टीका करण्यात आली. परंतु ही वज्रमूठ अभेद्य आहे आणि फार मोठ्या क्षमतेची असल्याचे विरोधकांना कळले असावे असा उपरोधिक टोलाही जयंत पाटील यांनी लगावला. महाविकास आघाडीच्या बाजूने कल असल्याचे शेतकऱ्यांनी, ग्रामपंचायतीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यानी दाखवून दिल्याचे त्यांनी सांगितले.
सांगली जिल्ह्यातील बाजार समित्या जत, कवठेमहांकाळ, मिरज तालुक्यातील असून इथेही मविआने 18 जागा जिंकल्या आहेत. महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळाले आणि सांगली जिल्ह्यात महाविकास आघाडी किती भक्कमपणे व एकत्रित सक्षम राहिल्यावर काय करुन दाखवते हे आज स्पष्ट झाले असेही जयंत पाटील म्हणाले. पाटील यांनी 148 बाजार समित्यांपैकी 75 पेक्षा जास्त बाजार समित्या महाविकास आघाडीने जिंकल्या आहेत. राज्यातील ग्रामीण जनतेने हे घवघवीत यश महाविकास आघाडीच्या मागे उभे केलं असल्याचे सांगितले. बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने मिळवलेल्या घवघवीत यशाबद्दल जयंत पाटील यांनी जनतेचे आभार मानले आहेत.