४०० वर्षे जुन्या भोसे येथील उन्मळून पडलेल्या वटवृक्षाची सुमनताई खाडे यांनी केली पाहणी
प्रतिष्ठा न्यूज/ योगेश रोकडे
मिरज प्रतिनिधी : भोसे ( ता.मिरज) येथील ४०० वर्षे जुना ऐतिहासिक वटवृक्ष उन्मळून पडला आहे, त्यानंतर पर्यावरण प्रेमींनी हा वटवृक्ष जतन करण्यासाठी पुढाकार घेतला असून, पर्यावरण प्रेमींनी हा वटवृक्ष त्याच ठिकाणी फांद्या छाटून जतन करण्याचा निर्णय घेतला आहे. तर वटवृक्षाच्या फांद्या भोसे, धुळगाव, मिरज आणि बिसुर या ठिकाणी लावण्याचा निर्णय घेतला आहे. अशी माहिती निसर्ग मित्र मुस्तफा मुजावर यांनी दिली.
सुमनताई खाडे यांना मुजावर यांनी राष्ट्रीय महामार्ग बांधकामवेळी या वृक्षाला वाचवण्यासाठी चळवळ उभी करून कसे यशस्वी प्रयत्न करण्यात आले हे सांगितले. तसेच सध्या या ऐतिहासिक वटवृक्षाचे जनुकीय जपणूक होणार असल्याचेही सांगितले आहे. त्याकामी एक संकल्पना सुचवली ती अशी की, आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री तथा कामगारमंत्री महाराष्ट्र राज्य डॉ. सुरेश भाऊ खाडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत या गतप्राण झालेल्या वटवृक्षाच्या फांद्या जिल्ह्यातील गावकऱ्यांना रोपनासाठी द्यायच्या व त्याची निगा व काळजी घेणाऱ्या लोकांना पुढील वाढदिवसाला पुरस्कार द्यायचा. या उपक्रमास सौ. खाडे यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद देण्याची ग्वाही निसर्गमित्र मुजावर यांना देण्यात आली. तसेच या ऐतिहासिक वटवृक्षाच्या संवर्धन कामी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे पर्यावरण प्रेमी लोकांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे.
यावेळी निसर्ग मित्र मुस्तफा मुजावर, भारतीय जनता पार्टी पदाधिकारी अभिनंदन पाटील, मनोज पाटील, ज्योस्तना माने, जयश्रीताई दाभाडे, यल्लामा देवीचे पुजारी व ग्रामस्थ उपस्थित होते.