सांगली महापालिकेतील खाबोगिरीमुळे विकास खुंटला : पै पृथ्वीराज पवार
प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका झाल्यानंतर या तिन्ही शहरांचा विकास होण्याऐवजी अत्यंत बिकट अवस्था झाली. याला जबाबदार इथले नेतेमंडळी, नगरसेवक आहेत. प्रत्येकाने फक्त स्वतःची घरे भरली. ते स्वतः डेव्हलप झाले. मात्र जनसामान्यांच्या मनातील सांगली निर्माण झाली नाही. कागदावर आणि बोलण्यापुरतं सांगली आमची चांगली अशी घोषणा झाली. मात्र अनेक पॅटर्न, टोळ्यांची निर्मिती झाली आणि टक्केवारी मध्ये विकास अडकला काही लोकांनी साखर कारखान्या पुरता मर्यादित विकास ठेवला. इथला कार्यकर्ता मोठा झाला नाही पाहिजे. इथल्या लोकांना सोयीसुविधा उपलब्ध झाल्या नाही पाहिजेत. यांनी आमचीच चाकरी करायला हवी. या मानसिकतेतून सांगली जिल्ह्याचा मालक होण्याचा काही लोकांनी प्रयत्न केला. त्यामुळेच सांगली विकासापासून दूर राहिली. असे मत आपुलकीच्या कट्ट्यावरती पारावरच्या गप्पागोष्टी मध्ये पै पृथ्वीराज पवार यांनी मांडले. आपुलकीच्या कट्ट्यावरती युवराज शिंदे यांनी सांगलीच्या लोकांच्या मनातील भावनांना हात घालत अनेक प्रश्नांना वाचा फोडली.
या कार्यक्रमाचे आयोजन युवा विकास कल्याणकारी सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष युवराज शिंदे यांनी केले. यावेळी रेखा पाटील, राजकुमार पेडणेकर, सुलोचना पवार, संतोष भुतेकर,पी बी साठे ,प्रकाश मालपाणी, रामहरी ठोंबरे, भीमराव कुंभार ,एन पी पाटील, सी जी टेके व परिसरातील जेष्ठ मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती.