पृथ्वीराज पाटील यांच्या पायाखालील वाळू घसरू लागल्याने काँग्रेस अंतर्गत वादाचे खापर भाजपवर फोडण्याचा त्यांचा खटाटोप : प्रकाश ढंग यांचा टोला
प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : पृथ्वीराज पाटील यांच्या पायाखालील वाळू घसरू लागल्यामुळे कुणावर तरी टीका करायची म्हणून काँग्रेस अंतर्गत वादाचे खापर भाजपवर फोडण्याचा त्यांचा खटाटोप सुरू आहे. जयश्री वहिनींच्यावर टीका, आरोप करण्याचे धाडस नाही म्हणूनच ते भाजपला जबाबदार धरत आहेत, असा टोला भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग यांनी लगावला आहे.
काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी काल विधानसभेच्या जागेवरून काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या वादाच्या मागे भाजप असल्याचा आरोप केला होता. त्याला आज भाजप शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग यांनी प्रत्युत्तर दिले.
श्री. ढंग यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे की, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पाटील यांना त्यांच्या पक्षातूनच जयश्री वहिनींचे आव्हान मिळाले आहे. त्यामुळे त्यांची उमेदवारी धोक्यात आली आहे. मात्र त्यांच्यावर बोलण्याची हिंमत नसल्यामुळेच पृथ्वीराज पाटील हे भाजपवर खापर फोडत आहेत.
काँग्रेसमधूनच पृथ्वीराज पाटील यांना जाहीरपणे आव्हान दिले जात आहे. त्यांच्या विरोधात सोशल मीडियावर मदनभाऊ गट सक्रीय झाला आहे. पण त्यांना उत्तर देता येत नाही स्वतःच्या पक्षातील कार्यकर्त्यांना दुखवायचे नाही म्हणून काहीतरी बोलायचे यासाठी भाजपवर ते घसरत आहेत.
गेल्या दोन निवडणुकीत आमदार सुधीर गाडगीळ यांनी विजय मिळवलेला आहे. याचा अर्थ सांगलीकर जनता सुधीरदादांच्या पाठीशी आहे. गेल्या दहा वर्षात आमदार सुधीर गाडगीळ यांनी कोट्यवधींची विकास कामे केली आहेत. हे सांगलीकर जनतेला चांगलेच माहिती आहे. त्यामुळे त्याचा गाजावाजा करण्याची गरज भाजपला नाही. सुधीरदादांनी केवळ आमदार निधीतूनच नाही तर विविध विभागांचा निधी आणून सांगलीत विकास कामे केली आहेत, तसेच तदादांच्या या कामाच्या आणि कर्तुत्वाच्या जोरावरतीच जनतेने त्यांना कार्यसम्राट ही पदवी ही दिली आहे त्यामुळे दादांच्या कार्यपद्धतीवर अथवा कामावरती शंका घेणे म्हणजे एक चुकच आहे
पृथ्वीराज पाटील यांचे स्वतःचेच पक्षातील अस्तित्व धोक्यात आल्याने ते आता स्वतःला वाचवण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे त्यांनी आधी स्वतःचे पक्षाचे अस्तित्व वाचवावे मगच भाजपवर टीका करावी असा टोलाही प्रकाश ढंग यांनी लगावला.