काँग्रेस अध्यक्षपदासाठी मतदान प्रक्रिया पूर्ण, महाराष्ट्रातून 547 तर देशभरातून 9500 जणांनी केले मतदान; बुधवारी निकाल; 24 वर्षानंतर मिळणार गांधी परिवाराबाहेरचा अध्यक्ष
प्रतिष्ठा न्यूज
मुंबई प्रतिनिधी : अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी आज मोठ्या उत्साहात मतदान झाले. प्रदेश काँग्रेसच्या टिळक भवन येथील कार्यालयात हे मतदान लोकशाही पद्धतीने पार पडले.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जून खरगे आणि खासदार शशी थरुर अध्यक्षपदाची यांनी निवडणूक लढविली. काँग्रेसच्या 24 वर्षानंतर आता काँग्रेसला गांधी परिवाराबाहेरचा अध्यक्ष मिळणार आहे.
देशातून एकूण 9900 मतदारांपैकी 9500 मतदारांनी आपल्या मतदानाचा अधिकार बजावला असून महाराष्ट्रातून एकूण 561 पैकी 547 मतदान झालं झालं. राहुल गांधी यांच्यासह 50 मतदारांनी भारत जोडो यात्रेच्या दरम्यान कँपमधून मतदान केलं. बुधवारी, 19 ऑक्टोबर रोजी काँग्रेसचा नवा अध्यक्ष कोण याचा निकाल लागणार आहे. दिल्लीत मतमोजणी होणार आहे.
उमेदवार मल्लिकार्जुन खरगे हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. कर्नाटकातून नऊ वेळा ते विधानसभेवर निवडून तर दोन वेळा खासदार म्हणून निवडून आले आहेत. सध्या ते संसदेत विरोधी पक्ष नेते आहेत. पन्नास वर्षांहून अधिक काळ त्यांचा राजकारणाचा प्रचंड मोठा अभ्यास आहे. दुसरे उमेदवार शशी थरूर हे केरळमधून लोकसभेवर तीन वेळा निवडून आले आहेत. तेही अभ्यासू खासदार आहेत. मल्लिकार्जुन खरगे हे काँग्रेसचे अध्यक्ष होतील असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष श्री. नाना पटोले तसेच श्री. बाळासाहेब थोरात आणि अन्य प्रमुख नेतेमंडळी या निवडणुकीवर लक्ष ठेवून होती.
सांगली जिल्ह्यातील सर्व मतदारांनी हक्क बजावला
आमदार मोहनराव कदम, आमदार विश्वजीत कदम, आमदार विक्रमसिंह सावंत, सांगली शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील, राज्याचे उपाध्यक्ष विशाल पाटील, जयश्रीताई पाटील, शैलजाभाभी पाटील, करीमभाई मेस्त्री, उत्तम पवार, अप्पाराया बिरादार, विलास साळुंखे, डॉ. दिग्विजय देशमुख, रवींद्र साळुंखे, डी.एम.पाटील, नंदकुमार कुंभार, माणिक भोसले, समित गायकवाड, बाळासाहेब पाटील या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
ही निवडणूक अत्यंत उत्साहात पार पडल्याचे सांगली शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री. पृथ्वीराज पाटील यांनी सांगितले.