कोश्यारी, त्रिवेदी यांच्या प्रतिमेला काळे फासुन सांगलीत तीव्र निषेध आंदोलन; राज्यपालांना बडतर्फ करून पार्सल परत पाठवा : पृथ्वीराज पाटील
प्रतिष्ठा न्यूज
सांगली, दि. २१ : छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान करणारे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी व भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांचा सांगली शहर जिल्हा काँग्रेस व महाविकास आघाडीच्या वतीने आज येथे तीव्र निषेध नोंदवण्यात आला व कोश्यारी आणि त्रिवेदी यांच्या प्रतिमेला काळे फासुन निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या.
कोश्यारी आणि त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केलेला आहे. त्यांचा निषेध करण्यासाठी सांगली येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर काँग्रेस, राष्ट्रवादी, मराठा सेवा संघ आणि अन्य पक्षांच्यावतीने हे प्रतिमेला काळे फासुन निषेध आंदोलन करण्यात आले.
यावेळी राज्यपाल कसले, हे तर भाज्यपाल,
कोश्यारी, त्रिवेदी तुमचं डोकं ठिकाणावर हाय काय?,
छत्रपतींची बदनामी करणाऱ्या अक्कलशून्य राज्यपालांना त्वरीत हटवा, भगतसिंग कोश्यारी
महाराष्ट्राला कलंक,
कडेलोट करा, कडेलोट करा कोश्यारी, त्रिवेदींचा कडेलोट करा !
रयतेच्या राजाचा अवमान करणाऱ्यांनो आता गाशा गुंडाळा !,
सत्तेसाठी खाल्ली माती, छत्रपतींचा अवमान झाला तरी मिंदे सरकार मौन का पाळती ?, छत्रपतींचा अवमान महाराष्ट्रातील जनता कदापि खपवून घेणार नाही. अशा घोषणा लिहिलेले फलक दाखवण्यात आले.
घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
यावेळी श्री. पृथ्वीराज पाटील म्हणाले, कोश्यारी आणि त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर अत्यंत खालच्या स्तरावर जाऊन वक्तव्य केले आहे. त्यांनी केलेल्या वक्तव्याचा आम्ही जाहीर निषेध करतो. जोपर्यंत सूर्य आणि पृथ्वी आहे, तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास कोणीही पुसू शकणार नाही. त्यांचा इतिहास अजरामर आहे. राज्यपाल कोश्यारी यांनी पदाचे भान न ठेवता छत्रपतींच्या बाबतीत चुकीचे वक्तव्य केलेले आहे. त्यांनी आपले वक्तव्य मागे घ्यावे, आणि जाहीर माफी मागावी. त्यांना बडतर्फ करावे आणि हे पार्सल महाराष्ट्रातून परत पाठवावे, अन्यथा महाराष्ट्रामध्ये तीव्र आंदोलन यापुढेही केले जाईल. त्रिवेदी यांच्यावरसुद्धा कडक कारवाई करण्यात यावी.
डॉ. सिकंदर जमादार म्हणाले, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना महाराष्ट्रात पदावर राहण्याचा अधिकार नाही.
अमित पारेकर म्हणाले, भाजप सरकार हिंदुत्वाचा खोटा चेहरा समोर आणून सत्ता व पदे मिळवत आहे. त्यांना खाली खेचण्याची वेळ आली आहे.
सुभाष खोत म्हणाले, महाराष्ट्रात येवुन शिवाजी महाराजांच्या विरोधात कोणी अपशब्द काढत असेल, तर आम्ही त्याला सोडणार नाही.
संतोष पाटील म्हणाले, आपण महाराजांच्यावर बोलतोय आणि महाराष्ट्रात बोलतोय याचा विसर राज्यपालांना पडला आहे. राज्यपालांचे वक्तव्य हे भाजपाचेच वक्तव्य आहे म्हणुन ते गप्प बसलेत.
राष्ट्रवादीचे विधानसभा क्षेत्र अध्यक्ष पद्माकर जगदाळे म्हणाले, छत्रपतींचा अवमान करणा-या राज्यपालांविरूध्द राजभवनास घेराव घालून सर्व पक्षीय मोठे आंदोलन उभा करू व कोश्यारी यांना पळवून लावू.
यावेळी नगरसेवक मयुर पाटील, तौफिक शिकलगार, अभिजित भोसले, रविंद्र खराडे, अजय देशमुख, कय्युम पटवेगार, नितीन चव्हाण, अल्ताफ पेंढारी, भारती भगत, विजय आवळे, शुभम बनसोडे, प्रशांत देशमुख, सुधीर जाधव, महावीर पाटील, मुनीर मुल्ला, मौलाली वंटमुरे, नामदेव चव्हाण, आशिष चौधरी, आयुब निशानदार, सोहेल बलबंड, शिवाजी मोहिते, प्रितम रेवणकर, माणिक कोलप, दिक्षीत भगत, सलमान मेस्त्री, सलीम मुल्ला, मंदार काटकर, अमित बस्तवडे, चेतन दगडे, प्रशांत अहिवळे, लालसाब मुल्ला, राजेंद्र कांबळे, बाबगोंडाज पाटील, याकुब मणेर, धनंजय खांडेकर, सुर्यकांत लोंढे, समर्थ शेळके, कॉंग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.