तासगावात ‘शासन आमच्या बोकांडी’ ; मयतांच्या नातेवाईकांकडे कागदपत्रांसाठी पोलिसाने मागितले ५० हजार
प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : तालुक्यातील तुरची येथील एका वृद्धाचा रस्ता अपघातात मृत्यू झाला.यानंतर अपघाती विमाचा लाभ घेण्यासाठी कागदपत्रांची मागणी संबंधिताणी त्या’ तपास अधिकाऱ्याकडे केली,यावेळी या कागदपत्रांसाठी पन्नास हजारांची मागणी तासगाव पोलीस ठाण्यातल्या एका पोलिसाने केली.हा प्रकार म्हणजे मेलेल्याच्या मढ्यावरच्या टाळूवरील लोणी खाण्यातला आहे.
२६ ऑगष्ट रोजी तासगाव तालुक्यातील तुरची येथील एका 62 वर्षाच्या मोटारसायकल वरून जाणाऱ्या वृद्धाला वडापच्या गाडीने अंधारात पाठीमागून उडवले.यावेळी त्या वृद्धाला सांगली येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलीस आले पंचनामा झाला.तीन आठवडे मृत्यूशी झुंज देऊनही कोमात असलेला तो वृध्द अखेर मयत झाला.यानंतर अपघाती विमाचा लाभ घेण्यासाठी कागदपत्रांसाठी त्यांचे नातेवाईक आपल्या वकिलांमार्फत रीतसर मागणी करू लागले.यासाठी गाडीची कागदपत्रे,पीएम रिपोर्ट, पंचनामा, एफ.आय. आर. एम एल सी. यांचा समावेश होता.
या कागदपत्रांची मागणी केल्यावर संबंधित पोलिसाने थेट ५० हजार रुपये देण्याची मागणी केली.आठ दिवसात तीन वेळा मागणी करून ५० हजाराचे प्रकरण ३० हजार रुपयांवर येऊन थांबले.घरात कामाला गेल्याशिवाय चूलही पेटणार नाही अशी परिस्थिती असणारे कुटुंब.ज्या कुटुंबाने आपला घरचा कर्ता माणूस गमावला. मागे दोन-तीन लेकरं त्यांनी पन्नास हजार रुपये कुठून द्यावं..? संबंधित पोलिसाची पन्नास हजाराची मागणी म्हणजे प्रशासन पोलिसांना पगारच देत नाही का काय..? त्यात दसरा-दिवाळी तोंडावर असल्यामुळे ‘दिवाळी’ मागण्याची ही पद्धत आहे का..? मयतांच्या नातेवाईकांकडून पोलीस अशा’ पद्धतीने आपला पगार काढायला लागलेत.त्यांच्या पगाराचा हा अजबच फंडा आहे, असंच म्हणावं लागेल.पोलिसांचा खरंच पगार होत नाही का..? त्यांनाही लेकरं बाळं आहेत. अतिशय प्रामाणिकपणे काम करणारी ही पोलीस “जात” त्यांच्या पगाराचा प्रश्न संबंधित प्रशासनाने तात्काळ मार्गी लावण्याची गरज आहे.सरकार मोठ्या दिमाखात ‘शासन आपल्या दारी’ ही योजना राबवत आहे.मात्र ‘शासन आमच्या बोकांडी’ असं म्हणायची पाळी तासगावात आली आहे.
मेलेल्या मढ्याच्या टाळूवरील लोणी खाण्याचा हा प्रकार भयानक आहे.यासाठी तासगाव पोलिसांचेच खरंतर समुपदेशन होणे गरजेचे आहे.समोरच्या माणसाची अडचण बघून किती ‘हात-पाय’ पसरायचं याचं भान पोलिसांनी ठेवणे गरजेचे आहे.पन्नास हजारांची मागणी पाहून आता ‘गृहमंत्री सहाय्यता निधी’ चालू झाला की काय…? असा प्रश्न तासगाव तालुक्यातील नागरिक आता विचारत आहेत.
*त्या पोलिसाची डिबीतून उचलबांगडी*
दरम्यान संबंधित नातेवाईकानी याप्रकरणी पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांच्याकडेच आपली कहाणी सांगितली.यानंतर वाघ यांनी संबंधित पोलिसाची डीबीतून तात्काळ उचलबांगडी करत जनरल ड्युटी लावण्यात आली. व आमच्यातील काही चुकीच्या माणसांच्यामुळे आपणास त्रास झाल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करत त्यांनी संबंधित कागदपत्रे नातेवाईकांच्या स्वाधीन केली.