शब्दांना कृतीची जोड दिल्यास समृद्ध भारताचे स्वप्न पूर्ण होईल : विठ्ठल मोहिते ; संविधान दिन साळुंखे हायस्कूलमध्ये साजरा
प्रतिष्ठा न्यूज
हरीपूर दि.२७ : येथील न्यू एज्युकेशन सोसायटी सांगली संचलित श्रीमती कोंडाबाई कुंडलिक साळुंखे हायस्कूलमध्ये २६ नोव्हेंबर हा संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. मुख्याध्यापिका सौ. स्मिता बेनिचेटगे यांचे हस्ते संविधानाचे पूजन झाले. सुहास कोळी यांनी स्वागत केले.
याप्रसंगी संविधान दिनाबद्दल विद्यार्थ्यांशी बोलताना सांस्कृतिक विभागप्रमुख विठ्ठल मोहिते म्हणाले की,”आपले संविधान सर्व समाज घटकांचे स्वातंत्र्य, समता, बंधुता व मानवता जपणारे आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जगभरच्या अनेक राज्यघटनांचा सखोल अभ्यास करून २ वर्षे ११ महिने व १८ दिवसांच्या अथक प्रयत्नातून ही राज्यघटना साकारली आहे. म्हणून डॉ . बाबासाहेब आंबेडकरांना आपण ‘भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार’ म्हणून संबोधतो. ही राज्यघटना स्वहित, समाजहित, राष्ट्रहित तसेच मानव कल्याणकारी आहे. हे आपण समजून घेऊन वाटचाल केल्यास समाजातील अनेक समस्या सुटतील. प्रगती होईल. आपण विद्यार्थ्यांनी दररोज प्रतिज्ञा व संविधानाची प्रास्ताविका म्हणण्याबरोबरच त्यातील विचारांचे आचरण करणे म्हणजेच खरे अंगीकृत करणे होय. शब्दांना कृतीची जोड दिल्यास समृद्ध भारताचे स्वप्न लवकरच पूर्ण होईल. आपण सर्वांनी संविधान समजून घेऊया व समजून देऊया. यातच सर्वांचे कल्याण आहे.”
संविधान दिनाच्या निमित्ताने विद्यालयात निबंध व चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी संविधान प्रास्ताविकेचे सामुदायिक वाचन करण्यात आले. राजकुमार हेरले यांनी आभार मानले तर सुनील खोत यांनी सूत्रसंचालन केले. संध्या गोंधळेकर ,पूजा पाटील, बबन शिंदे अजितकुमार कोळी, मनीषा वड्डदेसाई देसाई यांनी संयोजन केले.
याप्रसंगी शिक्षक, सेवक, विद्यार्थी उपस्थित होते.श