‘जेथे प्रश्न तेथे एन.डी.’- अॅड. अजित सुर्यवंशी ; प्रा. एन. डी. पाटील यांना सांगलीत शेकाप व अंनिसचे अभिवादन!
सांगली प्रतिनिधी : महाराष्ट्रातील जेष्ठ पुरोगामी विचारवंत,शेकापचे जेष्ठ नेते तसेच अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य अध्यक्ष राहिलेले प्रा. डॉ. एन. पाटील यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त कामगार भवन सांगली येथे आज अभिवादन सभा झाली. यावेळी त्यांच्या जीवनावरील माहितीपट दाखवला गेला. एन. डी. पाटील यांनी विविध क्षेत्रात केलेल्या कार्यावरील लेखांचे अभिवाचन करणेत आले.याप्रसंगी शेकापचे नेते अॅड. अजित सुर्यवंशी एन डी सरांच्या आठवणी सांगताना म्हणाले की, एन डी पाटील मुळे महाराष्ट्रातील राजकारण पुरोगामी विचारा भोवती फिरते आहे. एन डी सरांनी शेतकरी ,कामगार, रयत शिक्षण संस्था, सीमावाद, टोल विरोधी आंदोलन, अंनिस, शेकाप, सत्यशोधक समाज, सेझ, एनरॉन विरोधी आंदोलनात मोठे काम केले आहे. राजकारण नीतीमत्ता आणि जीवनात पुरोगामी विचार घेऊन वएनडीसर आयुष्यभर जगले. लोक लढ्यातील सरांच्या प्रचंड सहभागामुळे ‘जेथे प्रश्न तेथे एन.डी.’असे समीकरण समाजमानसात रुढ झाले होते. ते सांगली जिल्हाचे सुपुत्र होते म्हणून आज सांगली मध्ये ही मोठी आदरांजली सभा आम्ही आयोजित केली आहे.
अंनिसचे पूर्णवेळ कार्यकर्ते राहुल थोरात म्हणाले की, एन. डी. पाटील हे अंनिसचे स्थापनेपासून राज्य अध्यक्ष होते. शनिशिंगणापूर आंदोलन, जादूटोणाविरोधी कायदा या आंदोलनात एनडीसरांचा मोठा पुढाकार होता. एनडी सर हे चळवळीचे ‘फ्रेंड्स, गाईड आणि फिलॉसॉफर’ होते.
रयतचे जनरल बॉडी सदस्य अॅड. बाळासाहेब पाटील, रयतचे दक्षिण विभागाचे निरिक्षक हंचे, कॉ. शंकर पुजारी यांनी एन. डी.पाटील यांच्या आठवणींचा जागर केला. रयतच्या पाच शिक्षकांनी एन डी सरांच्या वरील ५ लेखांचे अभिवाचन केले.
या आदरांजली सभेस रयत चे माजी सचिव डॉ.अशोक भोसले, संभाजी ब्रिगेडचे डॉ. संजय पाटील, अॅड. तेजस्विनी सुर्यवंशी, अंनिसचे कार्यकर्ते अमित ठकार, डॉ. संजय निटवे, फारुख, डॉ. सविता अक्कोळे, सर्जेराव पाटील, सुनील भिंगे आणि रयत परिवारातील शिक्षक उपस्थित होते.आभार शेकापचे कॉ. दिगंबर कांबळे यांनी मांडले.
एन डी सरांना आदरांजली अर्पण करणेसाठी आलेल्या चाहत्यांनी कामगार भवनचे सभागृह पूर्ण भरले होते.