सावळज ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार, पथदिवे बंद असल्याने कित्येक महिन्यापासून मुख्य रस्स्यावर अंधार
नागरिकांची गैरसोय, तसेच अंधाराचा फायदा घेऊन भुरट्या चोऱ्यांचे प्रमाण वाढले त्यामुळे संतप्त नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात
प्रतिष्ठा न्यूज / अनिल शिंदे
सावळज दि. १४ : सावळज ( ता.तासगाव ) येथील ग्रामपंचायतीच्या हद्दीतील काही खांबावरील पथदिवे गेल्या कित्येक दिवसांपासून बंद असून याबाबत नागरिकांतून वारंवार तक्रार दाखल करून देखील याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले जात आहे ज्याप्रमाणे घरपट्टी, पाणीपट्टी, दिवाबत्ती, दुकान गाळे आरोग्य कर, अशा प्रकारे वसुलीसाठी ग्रामपंचायत आक्रमक असते व या वसुल्या युद्धपातळीवर करीत असते त्याच युद्धपातळीवर गावातील विकासकामे, व नागरिकांच्या विविध समस्या मार्गी लावाव्यात अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे सावळज गावात विविध समस्यांचा बट्ट्याबोळ सुरू आहे त्यामुळे नागरिकांची खूप मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे काही ठिकाणचे पथदिवे बंद असल्याने अंधाराचा फायदा घेऊन भुरट्या चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे, याबाबत नागरिकांतून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत याविषयी ग्रामपंचायतीने गांभीर्याने घेऊन तातडीने पथदिव्यांची दुरुस्ती करून नागरिकांची गैरसोय दूर करावी अशी मागणी संतप्त नागरिकांतून केली जात आहे.