भौतिक स्वच्छतेबरोबरच मनाची स्वच्छता महत्वाची : माजी मंत्री अजितराव घोरपडे; कन्या महाविद्यालयाच्या श्रमसंस्कार शिबीराचे मल्लेवाडी येथे उद्घाटन
प्रतिष्ठा न्यूज
मिरज प्रतिनिधी : देशाच्या सर्वांगीण विकासात ग्रामीण भागाचा वाटा नेहमीच मोलाचा राहिला आहे. देशाचा विकास करायचा असेल त्याची सुरुवात खेड्यापासून केली पाहिजे. सध्या देश विकासाच्या दृष्टीने जरी वाटचाल करीत असला तरी समाजात विकृती निर्माण होण्याचा धोका निर्माण झाला आहे. राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार शिबिराच्या माध्यमातून फक्त भौतिक स्वच्छता महत्वाची नसून प्रबोधनातून मनेदेखील स्वच्छ करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन राज्याचे माजी मंत्री अजितराव घोरपडे (सरकार) यांनी केले. मिरजेतील कन्या महाविद्यालयाच्या वरिष्ठ विभागाचे राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार शिबीर मौजे. मल्लेवाडी येथे संपन्न होत आहे. त्याच्या उदघाटन प्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. संस्थेचे अध्यक्ष विनायक गोखले हे अध्यक्षस्थानी होते.
या समारंभासाठी मिरजेचे तहसीलदार डी. एस. कुंभार, जेष्ठ विचारवंत अमृतराव सूर्यवंशी, संस्थेचे सचिव राजू झाडबुके, प्राचार्य डॉ. उल्हास माळकर, सरपंच विनायक पाटील, उपसरपंच सौ. वर्षाताई भोसले, सर्व सेवा सोसायटी चेअरमन प्रकाश क्षीरसागर, पोलीस पाटील अभय शिंदे, श्री. जयसिंग पाटील यांच्यासह सर्व सदस्य, सोसायटी पदाधिकारी, ग्रामस्थ व स्वयंसेविका उपस्थित होत्या. स्वागत व प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी डॉ. माधुरी देशमुख यांनी केले. जयसिंग पाटील यांनी परिचय करून दिला.
सुरुवातीस स्वयंसेविकांच्या एन.एस. एस. गीताच्या सादरीकरणानंतर शिबीराचे उदघाटन मान्यवरांच्या हस्ते रोपास पाणी घालून झाले. कु. अद्विका राजवर्धन घोरपडे या चिमुकलीने प्रार्थना सादर केली. श्री. जयसिंग पाटील यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला. तहसिलदार कुंभार म्हणाले की, अशा प्रकारच्या शिबिरामुळे विद्यार्थ्यांमध्ये व्यावहारिक व शिक्षणाची भर पडते. शिबिरामुळे संघर्षावर मात करून जीवन कसे जगता येते याची जाणीव होते. वाचन समृद्ध करा त्याचे रूपांतर कृतीत करा असा सल्लाही त्यांनी दिला. अध्यक्ष गोखले म्हणाले, शिक्षित, कृतिशील होण्याबरोबरच विद्यार्थीनीनी संस्कारित होणे गरजेचे आहे.
या शिबिरात श्रमदान, ग्रामस्वच्छता, प्रबोधनपर व्याख्याने, ई-कचरा संकलन, ग्रामसर्वेक्षण, वृक्षारोपण, विविध स्पर्धा, वनराई बंधारा असे विविध उपक्रम राबविले जाणार असल्याची माहिती यावेळी संयोजकांनी दिली. या कार्यक्रमाचे संयोजन डॉ. माधुरी देशमुख, डॉ. मंजिरी देशमुख, प्रा. विनायक वनमोरे, डॉ. गंगाधर चव्हाण, प्रा. रमेश कट्टीमणी, डॉ. सुनीता नाईक, प्रा. विश्वनाथ व्हनमोरे, सौ. मंदाकिनी भांगरे, ग्रामपंचायत मल्लेवाडी यांनी केले. आभार प्रा. बाबासाहेब सरगर यांनी मानले.