लग्न समारंभातील खर्चावर तसेच मरणदारी होणाऱ्या अनिष्ठ रूढी परंपरा वर बंदी घाला; महाराष्ट्र दिनी ग्रामसभेत ठराव घ्या : जिजाऊ ब्रिगेडची मागणी
प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : लग्न समारंभातील खर्चावर तसेच मरणदारी होणाऱ्या अनिष्ठ रूढी परंपरा वर बंदी घाला; महाराष्ट्र दिनी ग्रामसभेत ठराव घ्यावेत, अशी मागणी सांगली जिल्हा जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे
निवेदनाद्वारे करण्यात आली.
उपजिल्हाधिकारी विजयसिंह पाटील यांना निवेदन देण्यात आले. यावेळी जिजाऊ ब्रिगेडच्या अधक्षा प्रणिता पवार, विभागिय उपाध्यक्षा शीतल मोरे, जान्हवी पाटील, ज्योती सावंत, उद्योजक कक्षाच्या विभागिय अध्यक्षा आशा पाटील, संभाजी ब्रिगेड महिला विभागप्रमुख रेखा पाटील उपस्थित होत्या.
निवेदनात म्हटले आहे की,
लग्न समारंभावर प्रचंड पैशांची उधळपट्टी वाढली आहे. लग्न वेळेवर लागत नाही. खूप उशिरापर्यंत आलेल्या वऱ्हाडींना ताटकळत थांबावे लागते. त्यामुळे वेळेचा मोठा अपव्यय होतो. मरणदारी सुद्धा अंधश्रद्धा, अनिष्टरूढी, कालबाह्य परंपरा वाढत चालल्या आहेत. मृत झालेल्या पुरुषांच्या बायकोची (विधवा महिलेची) अंधश्रद्धेतून हेटाळणी केले जाते.
बहुजन समाजाने यातून बाहेर पडावे असे आवाहन करत मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष इंजी.पुरुषोत्तम खेडेकर यांनी समाजाला काही मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत.लग्न समारंभात मोठ्या प्रमाणावर तरुण पिढी दारू पिऊन डिजेच्या तालावर नाचते. त्यामुळे व्यसनाधींचे प्रमाण वाढत चालले आहे. मोठ्या आवाजात डीजे वाजल्यामुळे हृदयरोगाचे प्रमाण वाढत आहे.कर्णकर्कश डिजेच्या आवाजामुळे लग्न समारंभ परिसरातील नागरिकांना मोठा त्रास होतो. या पार्श्वभुमिवर या सर्व बाबी बंद करण्यासाठी आपण दिनांक १ मे महाराष्ट्रदिनी संपूर्ण महसूल विभागात डिजे मुक्त लग्न, दारूमुक्त वरात,वेळेवर लग्न हे ठराव ग्रामपंचायत मार्फत ग्रामसभेत पास करण्यासाठी आपण प्रशासकीय पातळीवर सूचना कराव्यात अशी मागणी आम्ही मराठा सेवा संघ प्रणित जिजाऊ ब्रिगेडच्या महिला आपणास करत आहोत.
विवाहघरी आपली प्रतिष्ठा जपण्यासाठी वधू-वरांचे पालक आलेल्या तरुण पिढीला मद्यपानाची व्यवस्था करून देतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर तरुण पिढी व्यसनाधीनतेकडे वळत आहे.१ मे महाराष्ट्र दिनी संपूर्ण राज्यभर शासनातर्फे ग्रामसभेचे आयोजन करण्यात येते.
अशा चुकीच्या प्रथा बंद करण्यासाठी शासनाने येत्या महाराष्ट्र दिनी संपूर्ण राज्यभर ग्रामसभा घेत डिजे मुक्त लग्न, दारूमुक्त वरात, वेळेवर लग्न या गोष्टींचा ठराव पास करण्यात यावा. प्रि वेडिंग फोटो, अनाठाई खर्च टाळावा, यासाठी विविध सामाजिक राजकीय संघटनांना सोबत घ्यावे. सदर बाबींचे उल्लंघन करणाऱ्या ग्रामपंचायतींवर सक्त कारवाई करण्यात यावी. यासाठी जिजाऊ ब्रिगेड महाराष्ट्र तर्फे आपणास निवेदन देत आहोत.