तासगावात मंगळवारी काँग्रेसची जनसंवाद यात्रा
प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : राहुल गांधी यांच्या बहुचर्चित भारत जोडो यात्रेला एक वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली जनसंवाद पदयात्रा मंगळवारी तासगाव तालुक्यात दाखल होत आहे, अशी माहिती तासगाव तालुका काँग्रेसचे अध्यक्ष महादेव नाना पाटील यांनी दिली.येथील काँग्रेस भवन मध्ये आयोजित पत्रकार परिषदेत महादेव नाना बोलत होते.यावेळी बोलताना महादेव नाना म्हणाले,देशभरात मोदी सरकारच्या विरोधात काँग्रेसने रणशिंग फुंकले आहे.राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली देशातील मोदी सरकार उलटून टाकण्यासाठी काँग्रेस सज्ज झाली आहे.भारत जोडोच्या माध्यमातून संपूर्ण देशाला प्रेमाने जिंकण्याचे व देशातली कटुता संपवण्याचा प्रयत्न राहुल गांधीनी केला,त्यांचेच अनुकरण करत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने जनसंवाद पदयात्रेचे आयोजन प्रत्येक जिल्ह्यात करण्यात आले आहे. मंगळवारी तासगाव शहर व तालुक्यात या पदयात्रेचे स्वागत करण्यात येत आहे.तासगाव शहरातून काँग्रेस भवन पासून या पदयात्रेची सुरुवात होईल माजी मंत्री विश्वजीत कदम,विशाल पाटील जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष विक्रम सावंत यांच्यासह मान्यवरांचे उपस्थितीत या पदयात्रेची सुरुवात होईल.गुरुवार पेठ,विटा नाका,मुस्लिम मोहल्ला,माळी गल्ली,भवानी गल्ली, दाणे गल्ली,ढवळवेस,वरचें गल्ली, कोकणे कॉर्नर,सिद्धेश्वर चौक,पोस्ट ऑफिस,गणपती मंदिर,सांगली नाका, तासगाव कॉलेज मनेराजुरी रोड वासुंबे मतकुणकी नागाव या मार्गे जाऊन कवठे एकंद मध्ये या यात्रेचा समारोप होईल.या ठिकाणी भव्य सभेचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती पाटील यांनी यावेळी दिली.