मनसेकडून शेतकऱ्याला ४ महिन्यात न्याय : दोष नसताना कब्जेपट्टी होती लांबणीवर
प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : शेत जमिनीच्या कब्जेपट्टीचा न्यायालयीन निकाल शेतकऱ्यासारखा होऊनही प्रशासनाच्या दिरंगाईमुळे शेतकऱ्याला ५ वर्षे मनस्ताप सहन करावा लागला,मात्र शेतकऱ्याला मनसे नेते अमोल काळे यांनी मदत करत चार महिन्यातच विषय सोडवला याबद्दल आरवडे येथील शेतकरी आकाश धोंडीराम वाघ यांनी तासगाव मनसेचे आभार मानले आहेत.
आरवडे येथील धोंडीराम कृष्णा वाघ यांनी १९८९ साली शेत वाटणी करून न दिल्यामुळे सदर ५ एकर २० गुंठे या क्षेत्रावरती वाटणीपत्राचा दावा दाखल केला होता.सदरचा दावा हा तासगाव येथील न्यायालयात चालू होता.याचा निकाल हा सन २००८ साली धोंडीराम कृष्णा वाघ यांच्या बाजूने लागलेला होता.या निकालावरती प्रतिवादी यांनी वरच्या कोर्टाकडे वर्ग केला.तेथे सदर वाटणीपत्राचा निकाल देखील धोंडीराम वाघ यांच्याच बाजूने लागला.सदरचे प्रकरण सन २०१९ साली तहसिलदार तासगाव यांचेकडे कब्जापट्टीसाठी आलेले होते. त्याच्यामध्ये कोणताही तांत्रीक दोष नसताना देखील सदरची कब्जापट्टी लांबणीवरती ठेवली.त्यावर कोणतीही दखल अधिकारी,तहसिलदार यांनी घेतली नाही.यातून न्याय मिळण्यासाठी लोकप्रतिनिधी यांचेकडे जावून सुध्दा न्याय मिळाला नाही.जुलै २०२३ मध्ये थेट महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तासगाव शाखेला आम्ही भेट दिली.मनसे जिल्हा संघटक अमोल जनार्दन काळे यांना भेटून त्यांना हकीकत सांगितली.त्यांनी योग्य तो न्याय मिळवून देतो असे सांगितले. अमोल काळे यांनी तहसिलदार कार्यालयातील प्रत्येक टेबल वरती स्वत: जावून कामाची चौकशी करून सदरचे काम अवघ्या ४ महिन्यात पूर्ण करून निकाली काढले.व सदरचे क्षेत्र हे धोंडीराम कृष्णा वाघ यांच्या कब्जात ३/१०/२०२३ रोजी मांजर्डे सर्कल यांनी दिले.संबंधित शेतकऱ्याने मनसे नेते अमोल काळे यांचे न्याय दिल्याबद्दल आभार मानले.