बेंद्रीच्या ग्रामसेविकेकडून महापुरुषांचा अवमान : ग्रामस्थ आक्रमक..
प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव:बेंद्रीच्या ग्रामसेविका शबाना अत्तार महापुरुषांच्या जंयतीदिवशी, पुण्यतिथी दिवशी जाणिवपुर्वक गैरहजर राहतात,यापुर्वीही अनेकदा असा महापुरुषांचा अवमान त्यांनी केलेला आहे.सदर प्रकाराची गंभीर दखल घ्यावी आणि त्यांची खातेनिहाय चौकशी करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी गट विकास अधिकारी अविनाश मोहिते यांचेकडे केली आहे. अर्जाची दखल न घेतल्यास ग्रामस्थांना ग्रामपंचायतीसमोर आमरण उपोषण करावे लागेल असा इशारा या निवेदनातून देण्यात आला आहे.
निवेदनात म्हटले आहे शबाना अत्तार यांच्या दोन वर्षांच्या कार्यकाल मध्ये सतत गैरहजर राहणे,वेळेवर न येणे, ग्रामस्थांची कामे वेळेत न करणे, महापुरुषांच्या जयंती व पुण्यतिथी दिनी जाणिवपुर्वक गैरहजर राहणे अशा चूका त्या सातत्याने करत आहेत.७ सप्टेंबर रोजी नरवीर उमाजी नाईक यांच्या जयंतीदिनी तसेच २ ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी आणि लाल बहाद्दूर शास्त्री या महापुरुषांच्या जयंतीदिनी त्या जाणिवपुर्वक गैरहजर राहीलेल्या आहेत.वरिष्ठांकडून रजा न घेताच त्या कामाला दांडी मारतात. पंचायत समितीने या निष्काळजी आणि बेजबाबदार ग्रामसेविकेची खातेनिहाय चौकशी करावी त्यांचेवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे.निवेदनावर ग्रामपंचायतीचे सदस्य सचिनकुमार मदने,शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य नंदकुमार जाधव,दिपक पाटील आणि अशोक पाटील यांच्या सह्या आहेत.