अण्णाभाऊ साठे हेच विद्रोही साहित्याचे खरे जनक : डॉ. बाबुराव गुरव
विद्रोही साहित्याचे जनक अण्णाभाऊ साठे या पुस्तकाचे प्रकाशन
प्रतिष्ठा न्यूज
कोल्हापूर (प्रतिनिधी ) : सर्वांवर प्रेम करण्याचा निर्धार व्यक्त करणे म्हणजेच विद्रोही होय. असत्याला, जुलमाला, शोषणाला, गुलामगिरीला विरोध करण्यासाठी ललकारने म्हणजे विद्रोह होय. समता, स्वातंत्र्य, विश्वबंधुत्वाच्या प्रकाशदाई विचारांना विरोध करणाऱ्या विषमतावर्धक शक्तींना आव्हान देऊन मैदानात उतरणे म्हणजे विद्रोह होय. या पुरोगामी विचाराला नेमके सुस्पष्ट, टोकदार रूप आपल्या साहित्यातून देण्याचे ऐतिहासिक काम लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी केले म्हणून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हेच विद्रोही साहित्याचे खरे जनक आहेत असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ. बाबुराव गुरव यांनी केले. ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त अण्णाभाऊंच्या विचारांचा जागर करण्यासाठी निर्मिती विचारमंच आणि धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने आयोजित कार्यक्रम प्रसंगी राजर्षी शाहू स्मारक भवन, कोल्हापूर येथे बोलत होते.
या वेळी अण्णाभाऊंच्या साहित्याचे अभ्यासक म्हणून प्रा. डॉ. बाबुराव गुरव व प्रमिला गुरव यांचा ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत प्रा. टी. के. सरगर यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व पुस्तक देऊन विशेष सत्कार करण्यात आला. त्याच बरोबर निर्मिती प्रकाशन प्रकाशित प्रा. डॉ. बाबुराव गुरव लिखित विद्रोही साहित्याचे जनक अण्णाभाऊ साठे या पुस्तकाचे प्रकाशनही यावेळी कवी व लेखक डॉ. रवींद्र श्रावस्ती यांच्या हस्ते करण्यात आले.
सुप्रसिद्ध कवी व लेखक विश्वास सुतार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या विद्रोही कवी संमेलनात निमंत्रित कवी म्हणून डॉ. अमर कांबळे, संघसेन जगतकर, प्रा. प्रकाश नाईक, डॉ. शोभा चाळके, प्रताप घेवडे, चंद्रकांत सावंत, विद्रोही कवी पी. के., रघुनाथ कापसे, स्वप्निल गोरंबेकर आदिंनी आपल्या विद्रोही कविता सादर केल्या. यावेळी ॲड. करुणा विमल, विमल पोखर्णीकर, सनी यळावकर, भरत गुरव, मिहीर कुलकर्णी, सदाशिव कांबळे, शिवाजी चौगुले, संजय सासणे, भगवान माने, महादेव चक्के, सुनील कांबळे,, बाळासाहेब भोसले यांच्यासह कवी व लेखक मोठया संख्येने उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक सुरेश केसरकर यांनी केले तर सूत्रसंचालन अनिल म्हमाने यांनी केले. आभार राहुल काळे यांनी मानले.