शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र खानापूरात होण्याबाबत ठराव मंजूर… तासगावकरांच्या आशा मावळल्या..
प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : अनेक वर्षापासून प्रलंबित असणाऱ्या शिवाजी विद्यापीठाच्या उपकेंद्राचा जागेचा प्रश्न अखेर मार्गी लागला असून,शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर अधिसभेमध्ये सांगली जिल्हा राष्ट्रवादीचें अध्यक्ष अॅडव्होकेट वैभव दादा पाटील यांनी मांडलेला उपकेंद्राचा ठराव एकमताने मंजूर झाला आहे.शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र सांगलीसह तासगाव तसेच अन्य जिल्ह्यातील काही ठिकाणी होण्याची मागणी सातत्याने होत होती.मात्र अखेर या ठरावामुळे *विद्यापीठाचे उपकेंद्र हे खानापूरलाच होणार असल्याचे निश्चित झाले आहे*.
शिवाजी विद्यापीठाची अधीसभेची बैठक विद्यापीठाच्या राजश्री शाहू सभागृहात आयोजित केली होती. सभेमध्ये शिवाजी विद्यापीठ अधिसभेचे सदस्य वैभव पाटील यांनी शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र खानापूर येथे व्हावे अशी मागणी केली होती. यावेळी सभेत बोलताना वैभव पाटील म्हणाले,शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र सांगली जिल्ह्यातील खानापूर या ठिकाणी व्हावे,या उपकेंद्रामुळे खानापूरसह,आटपाडी,जत, कवठेमहांकाळ,तासगांव,पलूस व कडेगांव या दुष्काळी तालुक्यातील विद्यार्थी व पालकांची सोय होणार आहे अशी शिफारस ही अधिसभा व्यवस्थापन परिषदेस करीत आहे.
या ठरावाला सूचक म्हणून सांगलीचे विशाल गायकवाड होते तर अनुमोदक म्हणून शिवाजी विद्यापीठ अधिसभेचे राज्यपाल नियुक्त सदस्य व विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी पाठिंबा दिला.यावेळी बोलताना आमदार पडळकर म्हणाले , संस्थेचे विकेंद्रीकरण झाले तर लोकांना न्याय मिळेल खानापूरची जागाही खानापूरसह आटपाडी,जत, कवठेमहांकाळ,तासगांव,पलूस व कडेगांव या दुष्काळी तालुक्यातील विद्यार्थी व पालकांसाठी सोयीची आहे.अधिसभेमध्ये या ठरावाला प्राध्यापक संघटना,विद्यापीठ विकास आघाडी,तसेच विकास मंच या सर्वांनी एकमताने पाठिंबा दिला.या ठरावावर अतिशय अभ्यासपूर्ण मत अॅडव्होकेट वैभव दादा पाटील तसेच आमदार गोपीचंद पडळकर,सिनेट सदस्य तसेच सांगली सुटा अध्यक्ष प्रा.डाॅ.निवास वरेकर,संजय परमाणे,श्री गायकवाड यांनी मते मांडली.खानापूरला उपकेंद्र होणार हा ठराव मंजूर झाल्याने तासगाव तालुक्यातील बस्तवडे येथे मिळालेली तत्वतः मान्यता दिल्याची उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे केलेली घोषणा हवेत विरली आहे.त्यावेळी विद्यापीठाच्या समितीने उपकेंद्र उभे करण्याच्या जागेला भेटही दिली होती.आर आर आबांनी गडचिरोली जिल्ह्यात विद्यापीठाच्या सुविधा उभ्या केल्या होत्या त्या आर आर आबांच्या तालुक्यात शिवाजी विद्यापीठ उपकेंद्रास मान्यता देताना मला विशेष आनंद होत आहे अशा भावना त्यावेळी उच्च शिक्षण मंत्री सामंत यांनी व्यक्त केल्या होत्या तसेच याबाबत तातडीने कार्यवाही सुरु करण्याच्या सूचनाहि मंत्री सामंत यांनी दिल्या होत्या.त्यामुळे विद्यापीठाचें उपकेंद्र बस्तवडे येथेच होणार असा विश्वास संपूर्ण तालुक्याला होता.परंतु काल झालेल्या बैठकीतील एकमताने केलेल्या मंजुरीने तासगावकरांच्या आशा मावळल्या आहेत.