श्रीरामलल्लांच्या महाआरतीने सांगली रामभक्तीत आकंठ बुडाली ; जणू अयोध्येच्या रघुनंदन मंदिरात महाआरती करत आहे : अयोध्येचे पुरोहित आचार्य ज्योतिशंकर यांचे प्रतिपादन
प्रतिष्ठा न्यूज
सांगली दि. २६ : सांगलीत कल्पद्रुम क्रिडांगणावर हजारो रामभक्तांच्या उपस्थितीत श्रीराम भक्ती उत्सवात आज पाचव्या दिवशी भारतीय प्रजासत्ताक दिनी उत्साहाने श्रीरामलल्लांची महाआरती करण्यात आली. श्री राम जन्मभूमी अयोध्या येथील विशेष निमंत्रित आचार्य ज्योतिशंकर तिवारी यांनी निवेदनात श्रीराम जन्मभूमी अयोध्येच्या राममंदिरात पहाटे चार वाजता श्रीरामजींच्या संपूर्ण दिपधूप मंगलारतीने दिनक्रम सुरु होतो,सकाळी सात ते रात्री दहा पर्यंत दिवसातून चार वेळा आरती करुन सुंदर नैवेद्य अर्पण केला जातो असे सांगून ‘जणू काही आज आम्ही अयोध्येच्या श्रीराम मंदीरात रघुनंदनाची महाआरती करत आहोत असे वाटले ‘ असे भावपूर्ण उद्गार काढले. या त्यांच्या उद्गाराने व शंखध्वनीने ‘श्रीरामांच्या जयजयकारांनी सांगली दुमदुमली आणि सांगलीचे आसमंत राममय झाले.
प्रारंभी श्रीराम भक्ती उत्सवाचे आयोजक पृथ्वीराज पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत केले.
अयोध्येच्या कालेराम मंदिराचे उदयभान पाठक, राकेश व मोहीत पांडे आचार्यांनी धूप व दिपारती करताना हजारो रामभक्त श्रीराम भक्तीत तल्लीन झाले.आचार्य ज्योतिशंकर सांगलीच्या चराचरात व घराघरात प्रभू रामचंद्रांच्या जयघोषाचे मंगलमयी ध्वनी प्रतिबिंबित झाले.
यावेळी सांगलीचे आयुक्त तथा प्रशासक मा. सुनिल पवार, उपायुक्त राहूल रोकडे, शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण, डीसीसी बँकेचे संचालक वैभव शिंदे व सौ. शिंदे, चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष अमर देसाई, सुशिल हडदरे, अनंत पारगावकर, राजेंद्रसिंह पाटील, बिपीन कदम, दै. सकाळचे शेखर जोशी, रमेश पाटील व गणेश कांबळे यांच्या हस्ते दि.२५ जानेवारीचे भाग्यवान आयोध्या यात्रेकरू निवडीची सोडत काढण्यात आली व या मान्यवरांचा सत्कार फौंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी केला. आमदार मानसिंगराव नाईक, माजी आमदार मोहनशेठ कदम, विशालदादा पाटील, पी. एस. पाटील, प्रशांत पाटील मजलेकर, शितल पाटील,डॉ. सुहास भावे, कमलाप्पा पट्टणशेट्टी, डीसीसी बँकेचे एमडी शिवाजीराव वाघ व बँकेचे कर्मचारी यांनी उपस्थित राहून श्रीराम दर्शन घेतले.
यानंतर आंतरराष्ट्रीय कृष्णभावना अमृत संघ(इस्कॉन) मिरजेचे प्रमुख वीरबाहुदास व त्यांच्या कोल्हापूरच्या सहकारी कलाकारांचा श्रीराम भजन व हरीकृष्णा महामंत्र किर्तनाचा कार्यक्रम झाल्यानंतर त्यांचा सत्कार करुन त्यांच्या व एन. एम. हुल्याळकर आणि प्रा. एन.डी.बिरनाळे यांच्या हस्ते आरती झाली. यावेळी इस्कॉन मार्फत वीरबाहुदास यांनी पृथ्वीराज व विरेंद्रसिंह पाटील यांना रामायण ग्रंथ भेट दिले.
दिव्यांग भक्तानी लावलेली हजेरी आणि आसपासच्या गावातील व सांगलीकर भक्तांची उपस्थिती लक्षवेधी होती.