तासगाव मुस्लिम समाज व आझाद कला क्रीडा असो कडून शिवजयंती साजरी…स्वराज्य निर्मितीत मुस्लिम मावळ्यांचे योगदान महत्वाचे : आलमशहा मोमीन
प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी अठरापगड जाती-धर्माच्या मावळ्यांना घेऊन स्वराज्याची निर्मिती केली,महाराजांच्या या स्वराज्य निर्मितीत मुस्लिम मावळ्यांचे देखील महत्त्वाचे योगदान आहे असे प्रतिपादन ग्राहक मंचाचे अध्यक्ष हाजी आलमशहा मोमीन यांनी केले.ते तासगाव शहर मुस्लिम समाज व आझाद कला क्रीडा असोसिएशनच्या माध्यमातून साजरी होणाऱ्या शिवजयंती निमित्त बोलत होते.
मोमीन पुढे म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य हे क्षमतावादी व सर्वांना न्याय देणारे होते,दर्यासारंग दौलत खान,इब्राहिम खान,रुस्तुमेजमान,सिद्धी हिलाल, मदारी मेहतर इत्यादी मुस्लिम मावळ्यांनी स्वराज्य रक्षणासाठी बलिदान दिलेले आहे.छत्रपती शिवाजी महाराजांच्या अंगरक्षका पासून ते खाजगी सचीवा पर्यंत सर्व विश्वासु मुस्लिम मावळे होते.आज खऱ्या अर्थाने देशाला छत्रपती शिवरायांच्या विचारांची आवश्यकता आहे.छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराजात जनता इतकी सुखी आणि प्रशासन इतके मजबूत होते,कि कोणताही अपराध करण्याची कोणाची हिंमत होत नव्हती.
कार्यक्रमाचे स्वागत आणि प्रास्ताविक करत असताना आझाद कला क्रीडा असोसिएशनचे अध्यक्ष माजी नगराध्यक्ष जाफरभाई मुजावर म्हणाले की गेल्या 19 वर्षापासून शिवजयंती उत्सव आम्ही सातत्याने साजरा करीत असून शिवाजी महाराजांचा इतिहास मुस्लिम समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम करीत आहोत.याला चांगला प्रतिसाद मिळत असून पुढेही शिवजयंती अशीच साजरी होणार असल्याचे त्यांनी सांगितले.याप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी सर्वश्री दगडू भाई जमादार,यासीन भाई मोमीन, सिद्दीक मुल्ला,अप्पालाल इनामदार,आझाद अली मुजावर,अब्दुल बारस्कर,अमीर मुल्ला,युनूस जमादार, आरिफ गवंडी,अय्याज जमादार,गौस मुल्ला,आयुब गवंडी,आयुब विजापुरे, शफिक जमादार,शोएब मुजावर, निहाल जमादार,वसीम मुल्ला,अमीर अलास्कर,आरिफ मुजावर,आणि मुस्लिम समाज मोठ्या संख्येने उपस्थित होते.शेवटी आभार इम्तियाज गवंडी यांनी मानले.