शुद्ध पाण्यासाठी काँग्रेसचा महापालिकेसमोर घंटानाद ; आठ दिवसात सुधारणा न झाल्यास महापालिकेवर मोर्चा काढण्याचा पृथ्वीराज पाटील यांचा इशारा
प्रतिष्ठा न्यूज
सांगली दि.२६: सांगली शहराला होत असलेल्या अशुद्ध आणि अळी मिश्रित पाणीपुरवठ्याच्या निषेधार्थ आज काँग्रेस तर्फे महापालिकेसमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले. पुढील आठ दिवसात परिस्थिती सुधारली नाही तर सांगलीकर नागरिकांचा भव्य मोर्चा काढून महापालिकेला घेराव घालू असा इशारा काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी दिला.
सांगलीकरांना शुध्द व पुरेसा पाणीपुरवठा करण्याची महापालिकेची जबाबदारी आहे. दूषित व अस्वच्छ पाण्यामुळे यशवंतनगर, संजयनगर, अभयनगर, शिंदे मळा, वसंतनगर, अहील्यानगर, पंचशीलनगर, गव्हर्न्मेंट काॅलनी, व सांगलीतील कांही भागात अळीमिश्रित दूषित पाणी पुरवठा होत आहे त्यामुळे जेष्ठ नागरिक, महिला व लहान मुले आजारी पडत आहेत. कमी दाबाने पाणीपुरवठा व कांही भागात पाणीच नाही अशी दयनीय अवस्था झाली आहे. जनतेच्या आरोग्याशी खेळणे बंद करून पाणीपुरवठा अधिकारी व कर्मचाऱ्यांना स्वच्छ व मुबलक पाणी पुरवठा सुरळीत करणेबाबत आदेश द्यावेत. येत्या आठ दिवसांत अमलबजावणी झाली नाही तर नागरिकांचा महापालिकेवर मोर्चा काढून आंदोलन केले जाईल, असे निवेदन आज आयुक्त सुनिल पवार यांना दिले. यावेळी प्रशासन खडबडून जागी झाले आणि त्यांनी पृथ्वीराज पाटील यांच्यासोबत या प्रश्नाचे सविस्तर चर्चा केली.
यावेळी पृथ्वीराज पाटील यांनी जुनी व कालबाह्य झालेली ५६ एमएलडी प्रकल्प बंद करून नवीन पुरेशी क्षमता असलेला प्रकल्प सुरू करावा व ७० एमएलडी प्रकल्पाची क्षमता वाढवावी, जुनाट पाईप लाईन बदलून नवी लाईन टाकावी, टाक्या स्वच्छता नियमितपणे करावी अशी मागणी केली.स्वच्छ व पुरेसा पाणीपुरवठा होण्यासाठी प्रस्तावित योजना शासनाला तातडीने सादर करावी. योजना कोणतीही राबवा पण सांगलीकरांना स्वच्छ आणि मुबलक पाणी पुरवठा झाला पाहिजे ही एकच मागणी आहे असेही ते म्हणाले.
यावेळी पाण्याचे मिटर चालू स्थितीत असताना बंद दाखवण्यात आले आहेत. ते दुरुस्त करणे , नवीन अपार्टमेंट मध्ये अवाजवी घरपट्टी आकारणी कमी करणे, टाक्यांची बांधकामे तातडीने पूर्ण करावीत अशी मागणी करण्यात आली.
यावेळी मा. आयुक्त सुनिल पवार यांनी यांनी लवकरच स्वच्छ आणि पुरेसा पाणी पुरवठा होईल अशी व्यवस्था केली जाईल असे आश्वस्त केले.उपायुक्त वैभव साबळे, कार्यकारी अभियंता चिदानंद कुरणे, पाणीपुरवठा विशेष कार्यकारी अधिकारी सुनील पाटील, आरोग्याधिकारी डॉ. वैभव पाटील यांनी चर्चेत भाग घेत उपाय योजनेची महिती दिली.
घंटानाद आंदोलनात व निवेदन देताना या वेळी नगरसेवक करण जामदार, संजय कांबळे, रविंद्र वळवडे, सनी धोतरे, नेमीनथ बिरनाळे, अल्ताफ पेंढारी, अजय देशमुख, बिपिन कदम, प्रशांत देशमुख, आशिष चौधरी, आयुब निशांदर, समीर मुजावर, प्रशांत कांबळे, राजेंद्र कांबळे, संजय मोरे, राहूल जाधव, प्रशांत अहिवळे कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.