प्रतिष्ठा न्यूज

गगनबावडा कोल्हापूर महामार्ग ठप्प; अतिवृष्टीमुळे नऊ घरांचे नुकसान

प्रतिष्ठा न्यूज / तुकाराम पडवळ
गगनबावडा, ता.10 : गगनबावडा परिसरात  गेल्या चार-पाच दिवसापासून पावसाने अक्षरशः थैमान घातले आहे. नदी नाल्यांना महापूर आल्याने पूरस्थितीजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. मंगळवारी सकाळपासूनच पावसाने जोरदार मुसंडी मारल्याने सायंकाळी उशिरा गगनबावडा कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावर मांडुकली दरम्यान रस्त्यावर पाणी आल्याने हा मार्ग ठप्प झाला आहे.
गगनबावडा परिसरात  चार-पाच दिवस धो-धो पाऊस कोसळत आहे. पावसाचा जोर कायम असल्यामुळे  मांडुकली, किरवे, लोंघे  येथे मंगळवारी सायंकाळपासून रस्त्यावर पुराचे पाणी आले. तर भुईबावडा व करुळ या दोन्ही घाटमार्गात किरकोळ पडझड सुरू आहे.
संपूर्ण महाराष्ट्रात सर्वत्र गेले चार दिवस मुसळधार पाऊस कोसळत आहे. गगनबावडा परिसराला जोरदार पावसाने अक्षरशः झोडपून काढले. सोमवारी मुसळधार पावसामुळे करुळ घाट रस्ता खचल्याने वाहतुकीस बंद करण्यात आला तर मंगळवारी सायंकाळी गगनबावडा तालुक्यात मांडूकली नजीक राष्ट्रीय महामार्गावर पुराचे पाणी आल्याने –कोल्हापूर तरळे महामार्गावरील वाहतूक पुर्णतः ठप्प झाली आहे.
घाटमाथा व कोकण यांना जोडणारा दुवा म्हणून करूळ घाट ओळखला जातो. परंतु दोन दिवसांपूर्वी घाटातील संरक्षक भिंत कोसळल्याने संबंधित प्रशासनाने हा मार्ग वाहतुकीस बंद केला आहे. मंगळवारी सायंकाळी कोल्हापूर तरेळे महामार्गावर  तालुक्यातील मांडूकली येथे  पुराचे पाणी आले. कुंभी धरणाचे पाणी सोडल्याने कुंभी नदीला पूर आला आहे. त्यामुळे रस्त्यावर पुराचे पाणी आले आहे. रस्ता पाण्याखाली गेल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
कोल्हापूरहून सिंधुदुर्गात जाणारी वाहने राधानगरी मार्गे जात आहेत. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातून येणारी वाहतूक आंबोली व फोंडाघाट मार्गे वळविण्यात आली आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास कोल्हापूर तरळे महामार्ग हा मार्ग अनिश्चित काळासाठी बंद राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

*अतिवृष्टीमुळे नऊ घरांचे दोन लाखांचे नुकसान*

   गगनबावडा तालुक्यात या चार-पाच दिवसात वादळ वाऱ्यासह अतिवृष्टी झाल्याने जवळजवळ नऊ घरांचे अंशतः भिंती कोसळून, पत्रे उडून दोन लाखांचे नुकसान होऊन  ऐन पावसाळ्यात संसार उघड्यावर पडले.
यामध्ये गगनबावडा मधील गंगाराम बाबू कोळेकर यांचे घराची भिंत कोसळून 20 हजाराचे नुकसान झाले. रेव्याची वाडी येथील आक्काताई तुकाराम चौकेकर यांचे घराची भिंत कोसळून पंधरा हजार रुपयाचे नुकसान झाले. तर गगनबावडा येथील विनोद सदाशिव पांगळे यांचे घराचे पत्रे उडून वीस हजाराचे नुकसान झाले. अन्य साखरी तील तीन घरांचे, साळवण मधील एका घराचे, असून असंडोली तील एका घराचे  व शेळोशीतील एका घराचे असे  सर्व मिळून दोन लाखाच्या आसपास नुकसान झालेले आहे.
शासनाकडून पंचनामे चालू आहेत. त्यांना लवकरात लवकर नुकसानभरपाई मिळावी. अशी नागरिकांची मागणी आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.