लाखोंचा दंड असलेली वाहने कवडीमोल किंमतीत विकण्याचा तासगाव तहसीलचा प्रताप…. जिल्हाधिकाऱ्यांनी यां प्रकरणाची दखल घेण्याची मागणी…
प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : तलाठी,कोतवाल,मंडल अधिकारी यांनी जिवावर उदार होऊन रात्रीच्या वेळी गस्त घालत असताना बेकायदेशीरपणे वाळू,मुरूम वाहतूक करताना पकडलेल्या जेसीबी,डंपर, ट्रक, टेम्पो, ट्रॅक्टर, ट्रॉली, मालवाहू वाहने पकडलेली असल्याने अनेक दिवस ही वाहने तहसील कार्यालयात पडून होती.या वाहनांचा ७ मार्च रोजी लिलाव करण्यात आला.त्याअगोदर या भंगार वाहनांचे प्रादेशिक उपपरिवहन कार्यालयातील अधिकाऱ्याकडून मूल्यांकन करण्यात आले होते.या वाहनांचे मूल्यांकन करताना गोलमाल करण्यात आला असल्याच्या तक्रारी होत आहेत.वास्तविक महसूल पथकाने विनापरवाना वाळू,माती, मुरूम वाहतूक करीत असताना ही वाहने रस्त्यावर,नदीपात्रात पकडलेली असतात,म्हणजे ती वाहने चालू स्थितीत असतात,असे असताना पकडलेली वाहने काहीकाळ बंद
स्थितीत राहिल्याने ती वाहने भंगार समजली जातात.त्या सर्व वाहनांवर कोट्यावधी रुपयांचा दंड असतो,अशावेळी वाहन मालकांना नोटीस देऊन दंडाची रक्कम भरून वाहन सोडवून नेण्यास सांगण्यात आलेले असते,परंतु वाहणाच्या किंमती पेक्षा दंड जास्त होत असल्याने तो दंड तो वसुल होण्यासाठी त्या वाहनांचा लिलाव काढला जातो.अशावेळी भंगार वाहन समजून लिलावात काढताना त्याचे योग्य मूल्यांकन होणे गरजेचे असते,योग्य मूल्यांकनामुळे शासनाला चांगला महसूल मिळतो.मात्र,सात मार्च रोजी लिलाव झालेल्या वाहनांचे योग्य मूल्यांकन झाले नसल्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत.झालेला वाहन लिलाव हा आधीच मॅनेज करून,एका एजंट मार्फत बोलीदार गोळा करून ठराविकच बोलिदारांना वाटून गाड्या दिल्याची चर्चा सुरू आहे.वास्तविक भंगार वाहन लिलावात घेण्यासाठी व बोली लावण्यासाठी तहसील कार्यालयात मोठी गर्दी झाली होती,परंतू स्पर्धात्मक बोली लावण्यासाठी परजिल्ह्यातून आलेल्या खरेदीदारांना ठरल्या प्रमाणे स्थानिक खरेदीदारांनी बोली लावू दिली नाही,स्थानिकांनी संगनमत करून अनेक वाहनांचे लिलाव आपल्या पदरात पाडून घेतले.ही बाब अत्यंत गंभीर असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणाची दखल घ्यावी अशी मागणी होत आहे.