तासगावात अनेक अनधिकृत महा ई सेवा केंद्र…केंद्र चालकांचा मनमानी कारभार
प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : आपले सरकार महा-ई-सेवा केंद्र,परवानगी देण्यात आलेल्या ठिकाणी केंद्राचे कामकाज होत नसल्याच्या अनेक तक्रारी होऊनही अशा केंद्रांची तपासणी करून नियमानुसार कार्यवाही करण्याचे धाडस प्रशासन कधी दाखवणार असा सवाल सामान्य नागरिक उपस्थित करत आहेत.राज्यातील ग्रामीण व शहरी भागात नागरिकांपर्यंत शासकीय,निमशासकीय व खासगी सेवा पोहोचविण्यासाठी आपले सरकार महा ई सेवा केंद्र,शासन निर्णयानुसार ग्राम विकास विभागामार्फत सुरु केलेली केंद्रे आहेत.दरम्यान,आपले सरकार महा ई सेवा केंद्र,शासनाचे मार्गदर्शक सुचनेनुसार कामकाज करीत नसल्याच्या अनेक तक्रारी झाल्या आहेत.तसेच संबंधीत महा ई सेवा केंद्र धारकास ज्या ठिकाणी आपले सरकार सेवा केंद्र चालविण्यास परवानगी देण्यात आलेली आहे,त्या ठिकाणी संबंधीत महा ई सेवा केंद्र चालक काम करीत नसुन ते दुसऱ्या ठिकाणी विनापरवानगी स्थानांतरीत होवुन महा ई सेवा केंद्राचे कामकाज करित असल्याच्या तक्रारी नागरिकांकडुन होत आहेत.त्यामुळे आपले सरकार महा ई सेवा केंद्र,यांना ज्या ठिकाणी केंद्र मंजूर करण्यात आले आहे,त्याच ठिकाणी कामकाज करणे बंधनकारक आहे.त्यानुसार चौकशी करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व तहसिल कार्यालयात निवासी नायब तहसिलदार,सेतु लिपीक तसेच जिल्हा प्रकल्प अधिकारी यांची याद्वारे नियुक्ती करण्यात आली आहे.परंतु शहरात सुरु असलेल्या अनधिकृत महा ई सेवा केंद्र वाल्यांची कोणतीही चौकशी प्रशासना कडून केली जात नसल्याचे दिसून येत आहे.अशा केंद्र चालकांकडून मनमानी पद्धतीने नागरिकांची लूट सुरु असल्याचे दिसत असून याबाबत प्रशासनाने गांभीर्याने योग्य ती कारवाई करावी अशी मागणी सामान्य नागरिकांतून होत आहे.