प्रतिष्ठा न्यूज

सांगली जिल्ह्यातील अवैध धंदे ताबडतोब बंद करण्यासाठी यंत्रणांनी अत्यंत गतीने कठोर कारवाई करावी : पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे

प्रतिष्ठा न्यूज
सांगली, दि. 06, (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील मटका, दारू, जुगार आदि सर्व अवैध धंदे ताबडतोब बंद करावेत. त्यासाठी यंत्रणांनी अत्यंत गतीने कठोर कारवाई करावी, असे निर्देश कामगार मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित केंद्र पुरस्कृत, राज्य सरकार अर्थ संकल्पातून व जिल्हा नियोजन समितीतून घेतलेल्या व घ्यावयाच्या विकास कामांच्या जिल्हास्तरीय आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, महानगरपालिका आयुक्त सुनिल पवार, अप्पर पोलीस अधिक्षक मनिषा दुबुले, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी चौगुले-बर्डे, जिल्हा नियोजन अधिकारी सरीता यादव यांच्यासह विविध विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित होते.

पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणुकीसाठीची आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागू शकते. त्यामुळे लोकोपयोगी कामे आचारसंहितेत अडकू नयेत यासाठी सर्वच यंत्रणांनी त्यांच्याकडील कामे त्वरीत सुरू करावीत. ज्या कामांना स्थगिती देण्यात आली आहे, अशा कामांची यादी करून त्वरीत सादर करावी. त्यातील जनतेसाठी उपयुक्त असणाऱ्या कामांची स्थगिती उठविण्यासाठी पाठपुरावा करू. जिल्हा नियोजन व्यतिरिक्त ज्या कामांसाठी राज्य अर्थ संकल्पातून होणारी कामे, केंद्र पुरस्कृत योजना, खासदार – आमदार निधी, नाबार्डकडून येणारा निधी यासारख्या अन्य लेखाशिर्षामधून निधी उपलब्ध होत आहे अशा कामांबाबत अवगत करावे.

कृष्णा घाटावरील मंदिराचे काम निधी उपलब्ध करून दिल्यानंतरही गेल्या बऱ्याच कालावधीपासून पूर्ण झाले नाही याबद्दल पालकमंत्री डॉ. खाडे यांनी या बैठकीत नाराजी व्यक्त केली. 25 : 15 मधील कामे जिल्हा परिषदेकडून करून घेण्यात येतात. ती कामे यापुढे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करून घेण्यात यावीत यासाठी शासन निर्णय बदलण्यासाठी प्रयत्न करू, असेही ते म्हणाले. यावेळी पालकमंत्री डॉ. खाडे यांनी जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडील कामाचा आढावा घेवून या यंत्रणेचे काम कौतुकास्पद असल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करून अधिक चांगल्या कामासाठी शुभेच्छा दिल्या. सांगली जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना NABH प्रमाणपत्र मिळविण्यासाठी चांगले काम करावे. त्यासाठी आवश्यक निधी देवू असे सांगितले. जिल्ह्यातील ज्या 400 ठिकाणी अंगणवाड्यांना इमारत उपलब्ध नाही त्यापैकी 57 अंगणवाड्यांसाठी जागा उपलब्ध आहे. उर्वरीत अंगणवाड्यांना जागा उपलब्ध नाही. अशा अंगणवाड्यांच्या जागा उपलब्धतेसाठी जिल्हा परिषद शाळांलगत, गावालगतचे गायरान, ग्रामपंचायत, महाराष्ट्र शासन यांच्या मोकळ्या जागांचा त्यासाठी विचार प्राधान्याने करावा, असे सूचित केले. ज्या अंगणवाड्या ओढे, नाले, कॅनॉल, विहिरी जवळ आहेत त्या ठिकाणी अप्रिय घटना घडू नये यासाठी संरक्षण भिंती बांधण्यात याव्यात. त्यासाठी ताबडतोब विभागाने सर्वेक्षण करावे. काही शाळांमध्ये रोबोटिक्स लॅब तयार करण्यासाठी प्रस्ताव द्यावेत अशा सूचना दिल्या. अंगणवाडी बांधकामासाठी पूर्वी आठ लाख रूपये निधी मंजूर होत होता. त्यामध्ये जिल्हा परिषदेने प्रस्ताव पाठवून मागणी केल्याने ही रक्कम आता 11 लाख 25 हजार करण्यात आली आहे. याबद्दल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांचे विशेष अभिनंदन केले.
समाज कल्याण विभागाकडील कामांचा आढावा घेत असताना पालकमंत्री डॉ. खाडे म्हणाले, दलित वस्तीमधील सुविधांसाठी असणारा निधी हा दलित वस्तीमध्येच सुविधांसाठी खर्च झाला पाहिजे. दलित वस्तीत पाणी, वीज, रस्ते यासारख्या सुवधिांवर भर द्यावा. जिल्ह्यात शिक्षाकंची जवळपास 800 पदे रिक्त आहेत. त्याचा शिक्षणावर विपरीत परिणाम होत आहे. त्यामुळे येत्या एक महिन्यात शिक्षकांची रिक्त पदे भरण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
लम्पी चर्मरोगाने जी जनावरे मृत्यूमुखी पडली आहेत त्याची येत्या आठ दिवसात नुकसान भरपाई पशुपालकांना द्यावी. त्यासाठी आवश्यक पाठपुरावा करावा असे सांगून पालकमंत्री डॉ. खाडे म्हणाले, पाटबंधारे, लघुपाटबंधारेकडील प्रकल्पांसाठी अनेक ठिकाणी भूसंपादन करण्यात आले आहे पण अनेक ठिकाणी भूसंपादनापोटीची रक्कम शेतकऱ्यांना अद्यापही मिळाली नाही. अशांचा आढावा घेवून शेतकऱ्यांना तातडीने त्यांची रक्कम उपलब्ध करून द्यावी, असे निर्देश दिले.

पालकमंत्री डॉ. खाडे म्हणाले, मिरज सिव्हिलमध्ये MRI मशिनसाठी जिल्हा नियोजन मधून निधी उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच जिल्हा नियोजन मधून मिरज सिव्हील मध्ये कॅन्सरवरील उपचारासाठी आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक सर्व पाठपुरावा करण्यात येईल. कोरोना काळात मिरज सिव्हील हॉस्पिटलने अत्यंत उत्कृष्ट काम केले त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेला मोठा आधार मिळाला, असे ते यावेळी म्हणाले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.